एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असं म्हणता, मग ते कोणत्या कारणासाठी जातील? एकनाथ शिंदेंकडे हरामाचा पैसा आहे आणि ते वाटतात असल्याचं फडणवीसांच्या सरकारमधील गणेश नाईक सांगतात. मग ते उघडपणे सांगा असं जाहीर आव्हान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात, सत्तेत ब्लॅकमेल करुन स्वार्थ साधण्याचा प्रकार सुरु आहे असाही आरोप त्यांनी केला आहे. यावेळी त्यांनी अजित पवारांनाही अर्धवट माहिती देऊ नका असं सांगितलं आहे.
निवडणूक आयोगाने आजचा दिवस सत्ताधाऱ्यांना दान केला आहे. शिंदे गटाकडे, भाजपाकडे, अजित पवारांकडे पैसा आहे. अजित पवारांनी पैसा कुठून येतो हे सांगितल आहे. शेकडो कोटीच्या फाईली बेकायदेशीरपणे मंजूर करण्यासाठी कशा आल्या हे त्यांनी सांगितलं. हे शिंदेंच्याही बाबतीत आहे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांच्या बाबतीतही आहे. त्यामुळे निवडणूक आयोग किंवा अँटी करप्शन ब्युरो काय करत आहे? ते काही करणार नाही. अजित पवारांनी कोणती फाईल आली हे अर्धवट सांगू नये. तुम्ही आम्हाला कोडी टाकू नका. तुमच्यात हिंमत आहे तर लोकांसमोर येऊ सांगा,” असं आव्हान संजय राऊतांनी दिलं आहे.
गणेश नाईकांना आव्हान आहे की कोडी टाकू नका. एकनाथ शिंदे तुरुंगात जातील असं म्हणता, मग ते कोणत्या कारणासाठी जातील? हे सांगा. एकनाथ शिंदेंकडे हरामाचा पैसा आहे आणि ते वाटतात असल्याचं फडणवीसांच्या सरकारमधील गणेश नाईक सांगतात. मग ते उघडपणे सांगा. याला ब्लॅकमेलिंग म्हणतात. तुम्ही माझं उघड करु नका, मी तुमची नाडी सोडणार नाही असं महाराष्ट्रातील राजकारण्यांचं सुरु असून हे योग्य नाही. अजित पवारांकडेही महाराष्ट्राच्या हिताची, महाराष्ट्र कसा लुटला जात आहे याची माहिती असेल, तर त्यांनी महाराष्ट्राचे नागरिक म्हणून उघड केलं पाहिजे,” असं त्यांनी सांगितलं आहे.
गुप्तपणे एकमेकांच्या फाईल काढत आहेत आणि एकमेकाला ब्लॅकमेल करत आहेत. शिदेंचं काही काढलं की ते फडणवीसांना ब्लॅकमेल करणार, फडणवीसांविषयी काही बोललं की ते शिंदे, पवारांना ब्लॅकमेल करणार. या महाराष्ट्राच्या राजकारणात, सत्तेत ब्लॅकमेल करुन स्वार्थ साधण्याचा प्रकार सुरु आहे,” असा आरोप यावेळी त्यांनी केला.
प्रचार काल संपला आहे, पण महाराष्ट्राच्या निवडणूक आय़ोगाने सत्ताधाऱ्यांना एक वेगळा तिळगूळ दिला आहे. प्रचार संपला तरी तुम्ही प्रचार करु शकता हे नवीन आहे. तोदेखील घराघरात जाऊन करु शकता. एकदा प्रचार संपला की तो संपतो ही आतापर्यंतची परंपरा होती. पण अचानक निवडणूक आयोगावर संशय यावा अशी भूमिका घेतली आहे,” असं त्यांनी म्हटलं आहे.
ठिकठिकाणी पैसे वाटणाऱ्यांना बदडलं जात आहे. आज हे नाट्य मोठ्या प्रमाणात घडू शकतं. जित्याची खोट मेल्याशिवाय जात नाही हे शिवसेना आणि भाजपाच्या बाबतीत मला म्हणायचं आहे. हिंदू-मुस्लिम आणि पैसे वाटप याशिवाय हे निवडणूक जिंकू शकत नाही. यांच्याकडे कोणताही विचार नाही. फक्त पैशांचं वारेमाप वाटप, सत्तेचा गैरवापर याशिवाय निवडणूक जिंकण्यासाठी काही नाही. राज ठाकरे, उद्धव ठाकरेंनी दिसेल तिकडे ठोका असं आवाहन केलं आहे. तरच हा महाराष्ट्र, मुंबई आणि लोकशाही वाचेल. लोकशाहीच्या रक्षणासाठी अशा लोकांना ठोकलं तर लोकशाही नावाची संस्था ठोकणाऱ्यांना आशीर्वाद देईल,” असंही त्यांनी म्हटलं.











