मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना म्हणाले, तुमचे पिताश्री हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वर्गातून पाहात असतील त्यावेळी त्यांना काय वाटत असेल? आता माझा मुलगा रशीद मामूसह बसायला लागला हे पाहिल्यानंतर त्यांना काय वाटत असेल? तुम्ही कितीही खोटं बोला तरीही या जनतेचा तुमच्यावर विश्वास नाही. अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर केली होती. याबाबत संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर मुख्यमंत्री मामू हे रशीद मामू पेक्षा भयंकर आहेत, असा पलटवार संजय राऊत यांनी केला आहे.
उद्या जर दाऊद इब्राहिम मुंबईत आला तर भाजपा त्यालाही उमेदवारी देईल, अशी टीका शिवसेना (ठाकरे) नेते संजय राऊत यांनी केली. ते म्हणाले, “उद्या जर दाऊद इब्राहिम मुंबईत आला तर तुम्ही (भाजपा) त्याला उमेदवारी द्याल. छोटा शकील, दाऊद इब्राहिम, अबू सालेम यांनाही तुम्ही तुमच्या पक्ष कार्यालयात बोलावून उमेदवारी द्याल. अशा प्रकारचं राजकारण भाजपाचं चालू आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या विकासावर, भविष्यावर बोललं पाहिजे. ते किरकोळ गोष्टींवर बोलत आहेत. या राज्याच्या प्रतिष्ठेचं अध:पतन देवेंद्र फडणवीस ज्या प्रमाणे करत आहेत, ते फार धक्कादायक आहे.”
संजय राऊत म्हणाले, “राज ठाकरेंनी सांगितलं, माझ्या घरी कोणी आला, जरी तो माझा मित्र असेल तरी मी त्यांची पापं झाकणार नाही. त्यांची पापं उघडी करेल. त्यासाठी हिंमत लागते. देवेंद्र फडणवीसांमध्ये हिंमत आहे का? भारतीय जनता पक्षाबरोबर जे लोकं आले आहेत, त्यांचा भ्रष्टाचार उघडा करण्याची हिंमत आहे का? ती हिंमत असेल तर त्यांनी बोलावं. गौतम अदानी हा तुमचा बाप झाला आहे. आता त्या बापासमोर तुम्ही थरथरताय. मुंबईत यापुढे विमानतळ नसेल, कारण ते आंतरराष्ट्रीय शहर आहे ना, मुंबई विमानतळाचा भूखंड अदानीला देणार आहेत, हे रशीद मामूपेक्षा भयंकर आहेत. मुख्यमंत्री मामू!” रशीद मामू पेक्षा मुख्यमंत्री मामू भयंकर असल्याची टीका संजय राऊत यांनी केली आहे.
संजय राऊत म्हणाले, “मुंबईत बोगस मतदारांना फटकावण्याची सुरूवात झाली आहे. जे पैशे वाटतायेत, त्या भाजपाच्या लोकांना शिंदेंचे लोक ठोकतायेत आणि शिंदेंच्या लोकांना भाजपाचे लोक ठोकतायेत. आम्ही त्यांना सुपारी दिली आहे. आम्ही ते आउटसोर्सिंग केलं आहे. दूबार मतदारांना ठोकण्याची सुरूवात सकाळी सातपासून सुरू होईल. जिथे बोगस मतदार आढळतील तिथे आमचे कार्यकर्ते जाऊन त्यांना ठोकतील.”











