आखाती देशातील वाढता तणाव आणि जागतिक ऊर्जा संकटाची वाढती तीव्रता या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (ता. 11 मे) जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी जनतेला सात महत्त्वाची आवाहने केली आहेत.
ज्यामध्ये प्रामुख्याने पेट्रोल-डिझेलचा मर्यादित वापर, वर्क फ्रॉम होमला प्राधान्य, सोन्याची खरेदी टाळणे आणि स्थानिक उत्पादनांचा (स्वदेशी) वापर वाढवण्यावर भर दिला आहे. तर किमान वर्षभर नागरिकांनी सोने खरेदी करू नये, असे आवाहनही मोदींकडून करण्यात आले आहे. मोदींच्या या आवाहनानंतर जनतेमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशात पुन्हा लॉकडाऊन लागणार आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिकाला पडला आहे. मात्र, याच मुद्द्यावरून आता विरोधकांनी पंतप्रधानांना लक्ष केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला नेत्या रोहिणी खडसे यांनी या आवाहनांना लक्ष करत मोदींनी खरं तर काय केले नाही पाहिजे, याची यादी लिहित त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.
शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोदींनी केलेल्या आवाहनांवर टीका करणारी एक पोस्ट लिहिली आहे. सामान्य जनतेनेच का सगळं पाळायचं? असा प्रश्न उपस्थित करत खडसेंनी मोदींनी नेमक्या कोणत्या गोष्टींवर मर्यादा घातल्या पाहिजे, त्या सात गोष्टी आपल्या पोस्टमध्ये नमूद केल्या आहेत. तर करून करून भागले आणि देव पूजेला लागले, असा टोलाही त्यांनी मोदींना लगावला आहे. तर, पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत प्रचार काय केला, मोठ्या रॅली घेतल्या, रोड शो झाले. आता पंतप्रधान महोदयांना संकट दिसू लागले आहे का ? असा खोचक सवालही रोहिणी खडसे यांनी उपस्थित केला आहे.
रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “काल @PMOIndia नरेंद्र मोदीजी यांनी देशातील जनतेला आवाहन केले आहे की,
1 – वर्षभर परदेश प्रवास बंद करा
2 – वर्षभर सोने खरेदी करू नका
3 – पेट्रोल, डिझेलचा वापर कमी करा
4 – मेट्रोचा वापर करा
5 – इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा
6 – वर्क फ्रॉम होम सुरू करा
7 – ऑनलाइन कॉन्फरन्सिंग, व्हर्च्युअल मीटिंग सुरू करा” पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये दणदणीत प्रचार काय केला, मोठ्या रॅली घेतल्या, रोड शो झाले… आता पंतप्रधान महोदयांना संकट दिसू लागले आहे का ? हे म्हणजे करून करून भागले आणि देव पूजेला लागले…” असा जोरदार टोला त्यांनी लगावला आहे.
तसेच, “मर्यादाच घालायची आहे तर…
1 – स्वतःच्या परदेश दौऱ्यांवर घाला
2 – सगळ्या मंत्र्यांसाठी जे व्हिआयपी कॉनव्हायवर घाला, त्यांनाही पब्लिक ट्रन्सपोर्टने फिरायला सांगा
3 – निवडणुकांमध्ये पैशांचा सुळसुळाट असतो तो बंद करा
4 – लाखो रुपयांचे कपडे घालणे बंद करा
5 – प्रायव्हेट जेट, हेलिकॉप्टर वापरणे बंद करा..
6 – आमदार खासदार खरेदी करण्यासाठी जे पैसे वापरता त्यावर आळा घाला
7 – हजारो कोटी रुपये जाहिरातींवर खर्च करता तो आधी बंद करा..” असे लिहित त्यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. तर, सामान्य जनतेनेच का सगळे पाळावे ? असा सवालही त्यांनी आपल्या पोस्टमधून उपस्थित केला आहे. त्यामुळे आता मोदींनी केलेल्या आवाहनामुळे वादाला तोंड फुटले आहे. कारण, विरोधक या आवाहनावर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहेत.











