पुणे : कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकाचे प्रकाशक व वितरक श्री. प्रशांत आंबी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांकडून पुण्यात करण्यात आली आहे.
या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख, महाराजांच्या इतिहासाची मोडतोड, संदर्भहीन व तथ्यहीन दावे तसेच हिंदू धर्मियांच्या व मराठा समाजाच्या भावना दुखावणारे लेखन जाणीवपूर्वक करण्यात आले आहे. गेली अनेक वर्ष या पुस्तकातील मजकुरावरून वाद सुरू असताना सध्याचे प्रकाशक श्री. प्रशांत आंबी यांनी याबाबत जाणीवपूर्वक कुठलीही कारवाई केली नाही, वादग्रस्त मजकूर पुस्तकातून हटवला नाही, असा आरोप मुठा खोऱ्यातील सरदार गंभीरराव मारणे – देशमुख यांचे वंशज रोहित मारणे यांनी केला आहे.
या प्रसंगी नाणे – मावळ खोरे येथील आदित्य गरुड – देशमुख, योगेश खोपडे देशमुख उपस्थित होते. या मागणीला स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज करणसिंह मोहिते – हंबीरराव, हिरडस – मावळचे प्रथमेश बांदल – देशमुख, बाजीप्रभु देशपांडे यांचे वंशज संदेश देशपांडे – प्रधान, बाजी पासलकर यांचे वंशज ऋषिकेश व सागर पासलकर, विचारे घराण्यातील बाळासाहेब विचारे, अटकवीर नानाजी पायगुडे यांचे वंशज अरुण काका व मुकुंद काका पायगुडे आदी मान्यवरांनी पत्र लिहून जाहीर पाठिंबा दिला आहे.
प्रशांत आंबी यांच्या विरोधात लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा व या वादग्रस्त पुस्तकावर बंदी घालण्यात यावी, अन्यथा लवकरच या विरोधात आंदोलन केले जाईल.. असा इशारा रोहित मारणे यांनी यावेळी दिला आहे !











