भोर तालुक्यातील कुरुंजी गावात असलेल्या श्री संत अनुसया माता मठ येथे येत्या उन्हाळी सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी निवासी वारकरी बालसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार दिनांक १ मे २०२६ ते १५ मे २०२६ या कालावधीत होणाऱ्या या शिबिरात सुमारे १०० ते १५० विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या शिबिराचे आयोजन युवाकीर्तनकार ह.भ.प. माऊली महाराज राजीवडे यांच्या पुढाकारातून होत असून, तालुक्यातील कीर्तनकार, गायक-वादक, तसेच ग्रामस्थ व सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. वारकरी परंपरेची ओळख करून देणे आणि मुलांमध्ये चांगले संस्कार रुजविणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.
शिबिरामध्ये धार्मिक व सांस्कृतिक शिक्षणावर विशेष भर देण्यात येणार आहे. यात श्रीमद् भगवद्गीता, हरिपाठ, संत गाथा, ज्ञानेश्वरी, हनुमान चालीसा, तसेच संत व महापुरुषांचे चरित्र वाचन यांचा समावेश असेल. याशिवाय टाळ, मृदुंग (पखवाज), हार्मोनियम यांचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण, भक्तीसंगीताची ओळख, लाठी-काठी प्रशिक्षण, योगासने आणि निरोगी, निर्व्यसनी जीवनशैली याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच विद्यार्थ्यांमध्ये आई-वडिलांप्रती आदर, देशभक्ती आणि नैतिक मूल्ये रुजविण्यावर विशेष भर दिला जाणार आहे.
आयोजकांनी सर्व पालकांना आवाहन केले आहे की, आजच्या काळात वाढत्या व्यसनाधीनतेमुळे व संस्कारांच्या अभावामुळे तरुण पिढी चुकीच्या मार्गावर जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आपल्या पाल्यांना योग्य संस्कार, धर्मपरंपरा व जीवनमूल्ये शिकविण्यासाठी या शिबिरात सहभागी करून घ्यावे.
उन्हाळ्याच्या सुट्टीचा सदुपयोग करून मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी हे शिबिर उपयुक्त ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.











