राज्य शासनाने परवाना धारक रिक्षाचालकांच्या परवान्यांची पुनर्तपासणी करण्यासह मराठी भाषा बोलण्याच्या अटीची पूर्तता होत आहे की नाही, याबाबत शहानिशा करण्याचा निर्णय घेतला आहे.मात्र, यामुळे अनेक रिक्षाचालक धास्तावले असून थेट गाड्या घेऊन गावाकडे जात असल्याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
येत्या १ मेपासून आरटीओ कार्यालयामार्फत ही तपासणी मोहीम हाती घेतली जाणार आहे. या निर्णयाला अनेक रिक्षा संघटनांनी विरोध केला असून तो मागे घ्यावा, अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत राज्यात परवाना घेऊन व्यवसाय करणाऱ्या चालकांना मराठी भाषा येणे आवश्यकच आहे, अशी ठाम भूमिका घेत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी निर्णय मागे घेण्यास नकार दिला आहे.
परिवहन मंत्र्यांकडून वारंवार भूमिका स्पष्ट केली जात असल्याने काही रिक्षाचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेक रिक्षाचालक थेट गावाकडे जात असल्याची चर्चा पुढे येत आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या तपासणी मोहिमेत अडकून रिक्षा जप्त होऊ नयेत, या भीतीने काही चालक वाहने घेऊनच जात असल्याचे समोर आले आहे. मात्र, ते कोणत्या मार्गाने आणि कसे जात आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही.
दरम्यान, राज्यात मराठी-अमराठी वाद चिघळत असून भविष्यात कोणतीही दुर्घटना घडू नये, या खबरदारीच्या दृष्टीने काही रिक्षाचालक गावाकडे जात असल्याचा दावा काही संघटनांकडून करण्यात आला आहे.
मागील काही दिवसांपासून रिक्षाचालक वाहने घेऊन गावाकडे जात असल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्य प्रदेश येथील चालकांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. अशा परिस्थितीत इतक्या लांबचा प्रवास रिक्षाने करणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही. त्यामुळे अफवांवर विश्वास न ठेवता असा चुकीचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन रिक्षाचालक-मालक संघटनांकडून करण्यात येत आहे.











