दाट लोकवस्तीमुळे नेहमीच गुन्हेगारी घटनांच्या चर्चेत असलेला पाचपावली परिसर रविवारी चालू वर्षातील पहिल्याच खुनाच्या घटनेने हादरून गेला. मद्यप्राशनानंतर झालेल्या किरकोळ वादातून तीन मित्रांनी मिळून चौथ्या मित्राचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
रमेश उर्फ वैद्य मुकुंदरावर मसराम (३७, रा. बुद्धाजी नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात पाचपावली पोलिसांनी शंकर भैसारे (४२), कपिल नगरारे (४५) आणि जसवंत सिंग अडी (५३) या तिघांना ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या आदल्या दिवसापासून हे चौघे शंकर भैसारेच्या घरी एकत्र मद्यप्राशन करत होते. रविवारी सकाळपासूनच पुन्हा मद्यप्राशन सुरू झाले. सायंकाळच्या सुमारास कसल्यातरी कारणावरून मित्रांमध्ये वाद झाला. मद्याच्या अंमलात हा वाद टोकाला गेला आणि लाठीकाठीने झालेल्या हल्ल्यात रमेश रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.
दुसऱ्या दिवशी सकाळी रमेश मृतावस्थेत आढळून आला, तर त्याच्या शेजारीच शंकर भैसारे बेशुद्धावस्थेत पडलेला होता. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांनाही मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी रमेशला मृत घोषित केले.
रमेशवर नेमका कोणी आणि कशा प्रकारे हल्ला केला, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी एकत्र मद्यप्राशन करणाऱ्या तिघांना संशयाच्या आधारे ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे.
विशेष म्हणजे, पाचपावली परिसरात गेल्या काही महिन्यांतील ही दुसरी खुनाची घटना आहे. सुमारे नऊ महिन्यांपूर्वी १० क्रमांक पुलाजवळील खासगी दंत रुग्णालयासमोर दगडाने डोके ठेचून एका व्यक्तीचा खून झाला होता. त्या घटनेनंतर पुन्हा एकदा घडलेल्या या खुनामुळे परिसरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.











