कल्याण पूर्व, पश्चिमेत गेल्या काही महिन्यांपासून अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्याने पालक चिंताग्रस्त झाले आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी इयत्ता दहावी, बारावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या तीन विद्यार्थिनी घरातून बेपत्ता झाल्या आहेत.
त्यांना अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार या अपहृत मुलींच्या पालकांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.
कल्याण पूर्व, पश्चिमेत अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे सर्वाधिक प्रमाण वाढत असल्याने पालक वर्ग चिंताग्रस्त झाला आहे. कल्याण पश्चिमेत वाडेघर पाणबुड्या नगरमध्ये गोविंद निंबळे आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्यांना सपना (१७) नावाची मुलगी आहे. तिने बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. तिचे वडील अमृत हेवन इमारतीत रखवालदार म्हणून काम करतात. ते नियमित रात्रपाळीत काम करतात. रात्रपाळी करून ते दिवसभर घरात झोपले होते.
संध्याकाळी सहा वाजता उठल्यानंतर घरात मुलगी सपना दिसली नाही म्हणून त्याने आपल्या मुलाला विचारले. त्याने सपना तिची मैत्रिण मोनिकाकडे गेली आहे असे सांगितले. सकाळी ११ वाजता गेलेली मुलगी संध्याकाळी घरी परतली नाही म्हणून गोविंद यांनी मुलीच्या मोबाईलवर संपर्क केला. तो बंद येत होता. मुलीचा परिसरात शोध घेतला. ती कोठेही आढळली नाही. त्यामुळे अज्ञात इसमाने तिला फूस लावून पळून नेल्याचा संशय व्यक्त करून गोविंद यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.
दुसऱ्या एका प्रकरणात कल्याण पश्चिमेतील भवानीनगर प्रेम ऑटो भागात राहत असलेल्या सुनील सिंग यांची मुलगी गेल्या महिन्यापासून बेपत्ता आहे. सुनील सिंग यांची मुलगी रामबागमधील एका हिंदी शाळेत शिक्षण घेते. २६ जानेवारीला झेंडावंदनासाठी जाते सांगून ती सकाळी सात वाजता घरातून निघून गेली. सकाळी ११ वाजले तरी मुलगी घरी आली नाही म्हणून सुनील यांनी तिच्या मैत्रिणींकडे चौकशी केली. ती शाळेत आली नसल्याचे मैत्रिणींनी तिच्या वडिलांना सांगितले. त्यामुळे मुलीला अज्ञाताने पळवून नेले असल्याची तक्रार सुनील सिंग यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात केली आहे.
खडकपाडा वायलेनगर भागात राहत असलेल्या योगेशचंद्र तिवारी यांची मुलगी गांधारे येथील अग्रवाल महाविद्यालयात बारावी वाणिज्य शाखेत शिक्षण घेते. बारावीची परीक्षा जवळ आली आहे म्हणून ‘तू आता अभ्यास कर. सारखा मोबाईल हातात घेऊ नकोस’ अशी सूचना तिच्या भावाने आपल्या बहिणीला केली. त्याचा राग येऊन बहिणीने रागाच्या भरात चिठ्ठी लिहून ठेऊन घरातून निघूुन गेली. कुटुंबीयांचा तिचा तिच्या मैत्रिणी, परिसरात शोध घेतला ती आढळून आली नाही. त्यामुळे तिला अज्ञाताने पळवून नेले असण्याची शक्यता या मुलीचा भाऊ अनिकेत यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यातील तक्रारीत व्यक्त केली आहे.
अटाळी भागातून एका भंगार विक्री करणाऱ्या महिलेची अल्पवयीन मुलगी मी स्वच्छतागृहात जाऊन येते सांगून परत घरी आली नाही. ती बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आईने खडकपाडा पोलीस ठाण्यात केली आहे. गेल्या महिन्यात बारावे गावातून दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. वाडेघर भागातून गेल्या महिन्यात एक चौदा वर्षाची मुलगी बेपत्ता झाली आहे.











