राज्याचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातासंदर्भातील सत्य ब्लॅक बॉक्सच्या तपासणीनंतरच स्पष्ट होणार असले, तरी या घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने तत्काळ CID मार्फत तपासाचे आदेश दिले आहेत. ही कार्यवाही राज्य सरकारच्या पारदर्शक, जबाबदार आणि संवेदनशील कार्यपद्धतीचे स्पष्ट उदाहरण मानली जात आहे.
मात्र या गंभीर घटनेनंतर सध्या सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांतून नको नको त्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. कोणी विमानाचा रंग निळा होता की लाल, कोणी विमानात पाच जण होते की सहा, तर कोणी बारामतीतून कोणाला आणि कोणत्या वेळी फोन आला याबाबत तर्कवितर्क मांडत आहे. या अपप्रचाराचा कोणताही ठोस आधार नसताना केवळ प्रसिद्धी, ‘लाईक्स’ आणि व्ह्यूजसाठी जनतेमध्ये संभ्रम व असंतोष पसरविण्याचा प्रकार सुरू असल्याची तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
अशा प्रकारच्या अफवा पसरविणाऱ्या आणि सामान्य नागरिकांच्या मनात अनावश्यक शंका निर्माण करणाऱ्या सर्व घटकांची CID मार्फत सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी आग्रही मागणी होत आहे. सामान्य नेटकऱ्यांनी काही काळ संयम बाळगणे अपेक्षित असताना, काही जबाबदार नेतेमंडळीही सोशल मीडियावर विविध संदर्भ देत, अपघात आणि दादांच्या निधनाबाबत थेट किंवा अप्रत्यक्ष वक्तव्ये करत असल्याचे दिसून येत आहे.
ही नेतेमंडळी सार्वजनिक जीवनातील जबाबदार व्यक्ती असल्याने, त्यांच्या वक्तव्यांमागे खरोखरच काही महत्त्वाची आणि खात्रीशीर माहिती आहे का, याची तपासणी होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. त्यामुळे CID चौकशीची व्याप्ती वाढवून, सोशल मीडियावर अशा स्वरूपाच्या पोस्ट करणाऱ्या व्यक्ती, नेते तसेच त्यांना ही माहिती देणारे सूत्रधार यांचीही सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पुढे येत आहे.
जर संबंधित व्यक्तींना त्यांच्या दाव्यांचे पुरावे सादर करता आले नाहीत, तर जनतेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अशीही स्पष्ट भूमिका मांडण्यात येत आहे. सत्य जनतेसमोर यावे, अफवांना पूर्णविराम मिळावा आणि प्रशासनावरील विश्वास अबाधित राहावा, यासाठी निष्पक्ष, सर्वंकष आणि कठोर तपास होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत नागरिक व विविध सामाजिक घटकांकडून व्यक्त होत आहे.











