डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील मनसेचे अभ्यासू, उच्चशिक्षित माजी नगरसेवक, शहराध्यक्ष ॲड. मनोज घरत यांनी रविवारी डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा गोपीनाथ चौकातील युतीच्या उमेदवारांच्या विजयी संकल्प सभेत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सभेला संबोधित करताना प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी मनसेचा डोंबिवलीतील लहान भाऊ भाजपमध्ये आला. आता लवकरच डोंबिवली परिसरातील मोठा भाऊ पण लवकरच भाजपमध्ये येईल, असे गुगली टाकणारे वक्तव्य करून मनसेसह भाजप कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकले.
पालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक २२ मधील युतीचे उमेदवार अश्विनी अनमोल म्हात्रे (वामन म्हात्रे यांच्या स्नुषा) आणि इतरांच्या प्रचारासाठी गोपीनाथ चौकात युतीतर्फे विजयी संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत डोंबिवली पूर्वेत भाजपचे उमेदवार महेश पाटील यांच्या विरूध्द मनसेकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेले ॲड. मनोज घरत यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
ॲड. घरत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रभागात प्रचार सुरू केला होता. परंतु, अचानक ॲड. मनोज घरत यांनी महेश पाटील यांच्या विरूध्दचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. अर्ज मागे का घेतला याविषयी सतत संपर्क साधुनही त्यांनी संपर्काला प्रतिसाद दिला नाही. अखेर त्यांनी मनसेचा राजीनामा दिला असल्याची चर्चा शहरात सुरू झाली. ॲड. घरत यांच्या माघारीने महेश पाटील यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा झाला. ॲड. घरत यांच्या माघारीविषयी उलटसुलट चर्चा शहरात सुरू होत्या. अखेर मनसेचे डोंबिवली शहर अध्यक्ष राहिलेले ॲड. मनोज घरत यांनी रविवारी भाजपमध्ये प्रवेश करून आपल्या राजकीय प्रवासाविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. घरत यांच्यासह त्यांचे समर्थक अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी भाजपमध्ये दाखल झाले.
या सभेत मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवलीतील मनसेतील आपला छोटा भाऊ भाजपमध्ये दाखल झाला. आता लवकरच डोंबिवली परिसरातील मोठा भाऊ पण त्याच वाटेवरून भाजपमध्ये येईल. हा भाऊ प्रतिक्षा यादीत अग्रक्रमावर असल्याचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी भाषणातून सांगताच, उपस्थितांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. दोन्ही वेगळ्या पक्षात असले तरी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मनसेचे कल्याण ग्रामीणचे माजी आमदार राजू पाटील यांची अनेक वर्षापासुनची घट्ट मैत्री आहे. त्यांचा पलावा भागात शेजार आहे.











