महापालिका निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. या प्रचाराच्या अनुषंगाने राज्यभरात विविध नेत्यांच्या सभा पार पडत आहेत. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे महापालिका निवडणुकीनंतर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणाच्या संदर्भात राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत.
असं असतानाच महापालिका निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? अशाही चर्चा आहेत. या चर्चांवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र, सुप्रिया सुळेंच्या मंत्रिपदाच्या चर्चांवर अजित पवारांनी थेट भाष्य करणं टाळलं आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र कशा आल्या? यावर भाष्य केलं. ‘आमच्या काही कार्यकर्त्यांचे विचार जुळले आणि त्यानंतर आम्ही ग्रीन सिग्नल दिला’, असं अजित पवारांनी म्हटलं. ते ‘मुंबई तक’च्या मुलाखतीत बोलत होते.
अजित पवार काय म्हणाले?
सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार? तुम्ही तोपर्यंत एकत्र येणार, अशा चर्चा सुरू आहेत. या फक्त चर्चाच आहेत का? यासंदर्भातील प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले की, “मी मीडियातूनच अशा सगळ्या बातम्या ऐकल्या. आता काय होतं, मध्यंतरी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आले आणि त्यानंतर बातम्या सुरू झाल्या. आताही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र निवडणूक लढवत आहेत. मात्र, निवडणूक एकत्र लढवत असले तरी त्यांनी दोघांचे पक्ष वेगवेगळे ठेवले आहेत. त्यांनी फक्त जागावाटप केलेली आहे. आता त्या दोघांच्या मनात काय आहे? हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. कारण ते दोघेही पक्षाचे प्रमुख आहेत”, असं सूचक भाष्य अजित पवार यांनी केलं आहे.
“आता तशाच पद्धतीने आमच्या काही खालच्या कार्यकर्त्यांमध्ये विचार जुळले आणि आपण एकत्र लढावं वैगेरे. त्यानंतर वाद नको म्हणून आम्ही त्या ठिकाणी ग्रीन सिग्नल दिला. आता महानगरपालिका, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पद्धतीने महाराष्ट्रात तसं घडलं. कोल्हापूर जिल्ह्यात. मग ते पुढे इंथपर्यंत (दोन्ही राष्ट्रवादीच्या युतीपर्यंत) पोहोचलं. हे असं झालेलं आहे. असं अजित पवार म्हणाले.
एक-एक स्टेप पुढे सुरू आहे का? असा प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, “एक-एक स्टेप असं नाही. पण मला जसं कळतंय तसं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढत असताना जेव्हापासून युतीचं किंवा आघाडीचं सरकार आलं, तेव्हापासून स्थानिक पातळीवर तेथील राजकारण पाहून स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात आलेले आहेत. आता २०२९ साठी आतापासून प्रोडिक्शन करण्याची अजिबात गरज नाही. आता आम्ही महायुतीत तिघेही (भाजपा, शिवेसना शिंदे, राष्ट्रवादी) काम करत आहेत आणि त्या पद्धतीने पुढे चाललो आहोत”, असं म्हणत अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंच्या प्रश्नाबाबत थेट बोलणं टाळलं.











