कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मुंबईच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमानाच वाढ झाल्याचं चित्र असून, त्यामुळं गारठा काही अंशांनी कमी होत असताना दिसत आहे. मात्र राज्यात सध्या विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका कायम असून ही स्थिती पुढील 24 ते 48 तास कायम राहील असा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हिवाळ्यातच राज्याला पावसाचाही इशारा असून किनारपट्टी भागांमध्ये तयार होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं जानेवारीतला पावसाळा यंदा अनुभवावा लागू शकतो असा प्राथमिक अंदाज आहे.
सध्या राज्यात थंडीचा कडाका काहीसा कमी होताना दिसत आहे ही वस्तूस्थिती. परिणामी कमाल आणि किमान तापमानात यामुळं 2 ते 3 अंशांची वाढ अपेक्षित आहे. राज्यात उत्तर महाराष्ट्र मात्र या स्थितीस अपवाद ठरत असून, इथं थंडीचा कडाका अधिक तीव्र असल्याचं जाणवत आहे. प्रामुख्यानं धुळे, निफाड, नाशिक इथं किमान तापमानात काही अंशांची वाढ झाली असली तरीही गारठा मात्र कायम असल्यानं ही वाढ फारशी परिणामकारक ठरत नाहीय. दरम्यान मुंबई शहर, कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर इथं काहीसं दमट हवामान असू शकतं असाही अंदाज आहे. कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वाऱ्यांची निर्मिती सध्या तामिळनाडूच्या तटावर होत असून, त्याचा परिणाम मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यावर दिसून येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.











