मुंबई:- ठाकरे बंधूंची संयुक्त सभा काल शिवाजी पार्कवर पार पडली. या सभेमध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी भाषण करत अनेक मुद्दे मांडत मराठी मतदारांसमोर ठाकरेंची भूमिका मांडली. राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी भाषणांमध्ये विविध मुद्दे मांडले. मुंबई महापालिका निवडणुकीआधीची ठाकरे बंधूंची ही पहिली आणि शेवटची संयुक्त सभा होती. त्यामुळे या सगळ्या संदर्भात जमलेल्या कार्यकर्त्यांना, मुंबईकरांना नेमकं काय वाटलं? कोणाचं भाषण आणि कोणाचे मुद्दे आवडले? या सभेचा कितपत फायदा निकालावर होईल?, याबाबत मुंबईकरांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राज ठाकरेंनी जी सध्याची वस्तुस्थिती आहे, ती मांडली. आता मराठी माणूस बेसावध राहणार नाही. राज ठाकरेंनी दाखवलेल्या व्हिडीओनंतर मराठी माणूस जागा झाला, अशी प्रतिक्रिया एका महिलेने दिली. तर विकास होतोय, पण मराठी माणूस उरलाच नाही, तर विकास काय करायचा आहे, असंही मुंबईकर म्हणाले. आज ही सभा झाली, ही बाळासाहेबांच्या विचारांची सभा झाली, अशी प्रतिक्रियाही एका कार्यकर्त्याने दिली.
एका मुस्लिम व्यक्तीनेही राज ठाकरेंनी मांडलेले मुद्दे महत्वाचे असल्याचं म्हटलं आहे. राज ठाकरेंचं भाषणातील मु्द्दे हिंदीत देखील लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे. राज ठाकरेंचं भाषण म्हणजे कपिल शर्माचा शो नाहीय. मला राज ठाकरेंचं भाषण आवडलं नाही, मी ते समजून घेतलं. राज ठाकरेंचं भाषण सगळ्यांना कळायला हवं. मुस्लिम असो, उत्तर भारतीय असो किंवा गुजराती असो, जो कोणी मुंबईकर आहे, त्यांनी ठाकरे बंधूंना निवडणून द्यायला हवं. ही ठाकरे बंधूंची युती ही सत्तेसाठी बनलेली नाहीय, असंही एक मुस्लिम नागरिक म्हणाला. ठाकरे बंधूंच्या मुंबईतील या सभेनंतर महापालिकेच्या निवडणुकीत फायदा झाला पाहिजे, अशी प्रतिक्रियाही समोर आली.











