विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारीची चर्चा सुरु झाली, भारतीय जनता पक्षातील काही नेत्यांची नावं हमखास चर्चेत येतात. त्यापैकी एक म्हणजे भाजप उपाध्यक्ष केशव उपाध्ये. मुख्य प्रवक्तेपद सांभाळलेल्या उपाध्येंना वर्षानुवर्ष विधान परिषद निवडणुकांच्या उमेदवारीने हुलकावणी दिली आहे.
आपल्याला आमदारकीची आस कधीच नव्हती, असं उपाध्ये वारंवार स्पष्ट करत असले, तरी त्यांचे चाहते, समर्थक आणि ट्रोलर त्यांना अनेकदा सोशल मीडियावरुन टोचून बोलतात. अगदी ‘सतरंजी उचल्या’ यासारख्या शब्दात त्यांची हेटाळणीही केली जाते. त्यामुळे हाच शब्द उचलून धरत केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून टीकाकारांना सडेतोड उत्तर दिलं आहे.
२५-३० वर्षांपूर्वी विचारधारेचे काम सुरू करताना कुठे, काय, कोण, कधी होणार याचा कधीही विचार केला नव्हता. प्रखर राष्ट्रवादाची भावना आणि सकारात्मक काम करण्याची जिद्द, यातूनच या प्रवासाला सुरुवात झाली… आणि पाहता पाहता २५-३० वर्षे कधी निघून गेली ते कळलेच नाही.
ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम करत राहिलो… अनेक प्रसंग आले आणि मग अशा वेळी अटल बिहारी वाजपेयी नेहमी ज्यांची कविता सांगायचे त्या शिवमंगल सिंह सुमन यांच्या ओळी कायम प्रेरणा देत राहिल्या… “संघर्ष पथ पर जो मिले, यह भी सही… वह भी सही…”
हीच एका खऱ्या कार्यकर्त्याची भूमिका असते… आणि तीच भूमिका आजही कायम आहे, असं केशव उपाध्ये यांनी म्हटलं आहे.परवा सायंकाळी विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर झाले. हे सर्व सहकारीच आहेत. त्यामुळे मनापासून आनंद झाला. सुनील कर्जतकर, माधवी नाईक, प्रमोद जठार तसेच संजय भेन्डे आणि विवेक कोल्हे यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
बाकी… मला ट्रोल करण्यात, ‘सतरंजी उचले’ म्हणण्यात ज्यांना आनंद मिळतो, तो त्यांनी जरूर घ्यावा. त्यांनाही मनापासून शुभेच्छा! असा तिरकस टोलाही केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.











