आपल्या सर्व संतानी तारुण्य मध्ये विविध दर्जेदार ग्रंथ लेखन केले. त्याचा आस्वाद तारुण्यातच घेतला पाहिजे. तारुण्य म्हणजे आयुष्याला घडवणारा काळ असून तो जल्लोषाचा काळ नाही. कल्पनेचे वैभव आणि संस्कृती समजण्यासाठी संत साहित्य समजून घेतले पाहिजे. संताची भूमिका एखाद्या विज्ञाननिष्ठा प्रमाणे असते. अनेक गोष्टीचा बारकाईने विचार आपल्या संतानी त्याकाळी केले आहे. आपले संत हे भोळेभाबडे नव्हते तर त्यांना अभ्यासपूर्वक जीवनाचा सार विविध गोष्टीतून दूरदृष्टीने परखडपणे सांगितला असे मत अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले.
एच.आय.व्ही. संसर्गित मुलांचे संगोपन व शिक्षण करून त्यांचे जीवन फुलविणाऱ्या ‘मानव्य’ संस्थेच्या संस्थापिका कर्मयोगिनी कै. विजयाताई लवाटे यांच्या २१ व्या स्मृतिदिनानिमित्त बुधवारी एस.एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे विशेष व्याख्यान व नृत्य-नाटिकेचे आयोजन करण्यात आले होते. अ.भा. मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांचे ‘प्रश्न आजचे – उत्तर संत साहित्याचे’ या विषयावर व्याख्यान यावेळी पार पडले.याप्रसंगी ‘मानव्य’ संस्थेचे अध्यक्ष शिरीष लवाटे , जेष्ठ नृत्यांगना स्वाती दैठणकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी तर आभार प्रदर्शन समीर ढवळे यांनी केले.
प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, मला विजयाताई आणि भैय्या साहेब वैद्य या भावंडांनी दोन वेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम केले याचे अप्रूप वाटते.मानवता गाभाऱ्या मधील नंदादीप म्हणून विजयाताई यांनी एचआयव्ही बाधित यांच्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत समर्पित काम केले. विजयाताई गेल्यावर त्यांचा मुलगा आणि सून यांनी अविरतपणे काम पुढे सुरू ठेवले ही अभिमानाची बाब आहे. आज समाजात सर्वात मोठा प्रश्न आरोग्याचा आहे कारण, सर्वेक्षणानुसार आगामी काळात सर्वाधिक मधुमेही, हृदय रोगी भारतात राहतील अशी भीती व्यक्त केली जात आहे.
त्यामुळे संतानी जी आपल्याला शिकवण चांगले आरोग्य आणि सक्षम शरीरयष्टी हवी असे सांगितले आहे. आज बिघडलेल्या परिस्थिती मागे बदललेली जीवनशैली आहे. जागरण, मद्य व्यसन हे शरीराला अपायकारक आहे. जीवनशैलीबाबत मार्गदर्शन संत साहित्यात सांगण्यात आले आहे. आज स्वविचार करणारा एकांत भेटणे अशक्य झाले आहे. समाज जीवन जगताना इतरांना भेटताना एकटे बसून विचार करणे आज हरवले आहे. आधुनिक गोष्टी ज्या सांगितल्या जातात त्या सर्व आपल्या ग्रंथात आदिच सांगितले आहे.
जीवनात खोट्या प्रतिष्ठेला महत्त्व प्राप्त होते ही चुकीची बाब आहे. व्यसनाधीन समाज कधीच उत्कर्षाकडे जाऊ शकत नाही. आज समाजा समोर सर्वत्र मोठे वादळ म्हणजे नैराश्य आहे. छोट्या गोष्टीवरून टोकाचे पाऊल सध्या उचलले जात आहे. नैराश्यावर मात करण्यासाठी सकारत्मकता महत्वाची आहे. आपल्या संतानी त्याकाळात अनेक प्रतिकूल गोष्टीवर मात केली हे जाणून घेतले पाहिजे.
संतांच्या सकारात्मक विचारातून परदेशी व्यक्ती आदर्श घेतात पण आपण काही शिकत नाही ही शोकांतिका आहे. त्यामुळे शिक्षक आणि पालक यांनी सकारात्मक दीप मुलांमध्ये रुजवून पुढे नेले पाहिजे. आपल्या समोर शिक्षण आणि नोकरी याचा कोणता संबंध राहिला नाही. त्यामुळे जीवन आणि शिक्षण याची सांगड घालून पुढे वाटचाल केली पाहिजे. शिक्षण तज्ञ यांनी याबाबत गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे.
जगातील प्रत्येक माणूस हा एका वेगळ्या कामासाठी घडवला गेला आहे. परंतु एकाच पध्दतीने सर्वांना घडवणे अयोग्य आहे. मुलांचे अंतरंग समजून घेतले पाहीजे.त्यांचा कल काय आहे हे तपासून पाहावे. समाजासमोर दिखावा हे मोठे संकट आहे, दिखाऊपणाच्या नादात टिकाऊ असणारी सत्व हरवत चालली आहे. तंत्रज्ञान मागे धावून केवळ उपयोग नाही तर तत्त्वज्ञान देखील आवश्यक आहे.
शिरीष लवाटे म्हणाले, माझी आई २१ वर्षापूर्वी गेल्यावर आईचे कार्य पुढे नेण्याचा संकल्प केला, त्यात आज थोडेफार यश आले आहे. एचआयव्ही झालेली मुले कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. शारीरिक आणि बौद्धिक स्वरूपात ते कुठे मागे नाही हे ते वेळोवेळी सिद्ध करतात त्यामुळे त्यांना समाजाने स्वीकारण्याची गरज आहे. त्यांना दूर सारून काही गोष्टी शक्य होणार नाही. मुलांची वेगवेगळी कौशल्य विकसित करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहे.
डॉ.अश्विनी देशपांडे म्हणाल्या, सन २००८ मध्ये मानव्य मध्ये उमेद या फिरत्या दवाखान्यात काम करत होते. एचआयव्ही ग्रस्त यांना विविध त्रास देण्यात येतो हे पहावयास मिळाले. वैचारिक द्वंद माझे सुरू झाले आणि नृत्य नाटीका माध्यमातून अष्टनायिकाद्वारे एचआयव्ही गैरसमजबाबत विविध गोष्टीची मांडणी करण्यात आली आहे.
यावेळी मानव्य संस्थेतील युवतींनी सादर केलेली ‘एक सफर आनंद की ओर’ ही नृत्य-नाटिका सादर करत उपस्थितांची मने जिंकली. याचे लेखन व दिग्दर्शन डॉ. अश्विनी देशपांडे यांनी केले असून विशेष मार्गदर्शन ‘मानव्यच्या’ विश्वस्त विनया देसाई यांचे लाभले. एच.आय.व्ही. सहजीवन जगणाऱ्यांविषयी संवेदना जागृत करणारी ही नृत्य-नाटिका आहे.











