April 23, 2026 3:33 pm

*’तुम घाटी लोग…’ मुंबईतील बड्या बिल्डरला ‘ते’ शब्द भोवले

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

मुंबईतील एका नामांकित बिल्डरने मराठी तरुणाला केलेल्या मारहाणीचे आणि जातीवाचक शिवीगाळीचे प्रकरण आता चांगलेच पेटले आहे.

क्षुल्लक कारणावरून सुरू झालेल्या या वादाने आता हिंसक वळण घेतले असून संतापलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संबंधित बिल्डरचे कार्यालय फोडल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे चेंबूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून राजकीय वातावरणही तापू लागले आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

पीडित तरुण राहुल जाधव हा बिल्डर सुशील रहेजा यांच्याकडे कामाला आहे. काही दिवसांपूर्वी ऑफिसमधील कामाचे कागदपत्रे म्हणजेच पेपर नीट स्टेपल केले नाहीत, या कारणावरून सुशील रहेजा यांचा पारा चढला. त्यांनी राहुलला सर्व स्टाफसमोर केवळ मारहाणच केली नाही, तर अत्यंत खालच्या भाषेत जातीवाचक शिवीगाळही केली. ‘तुम घाटी लोग कभी सुधरेगा नही’, अशा शब्दांत त्याचा अपमान केल्याचा आरोप राहुलने केला आहे. या घटनेनंतर पीडित तरुणाने पोलिसांत धाव घेतली होती.

वंचितची आक्रमक भूमिका

या घटनेची माहिती मिळताच वंचित बहुजन आघाडीने पीडित तरुणाच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला. याप्रकरणी मुंबईतील गोवंडी पोलीस स्टेशनमध्ये सुशील रहेजा विरोधात अट्रोसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी आरोपी बिल्डरला अटक केली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात होता.

बिल्डरचे ऑफिस फोडले

सुशील रहेजा हे शनिवारी चेंबूर येथील त्यांच्या कार्यालयात असल्याची माहिती वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेशाध्यक्षा स्नेहल सोहनी आणि युवा आघाडीचे सागर गवई यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह ऑफिसच्या दिशेने कूच केले. वंचितचे पदाधिकारी येत असल्याची चाहूल लागताच रहेजा तिथून निघून गेले. यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. यावेळी कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडी जिंदाबादच्या जोरदार घोषणा दिल्या.

राजकीय आरोप आणि मनसेची उडी

या प्रकरणावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपही सुरू झाले आहेत. मनसे नेते गजानन काळे यांनी ट्विट करत या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. मुंबईत भाजपची सत्ता असल्याने अशा लोकांची हिंमत वाढत असल्याची टीका त्यांनी केली. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार असल्याने मराठी तरुणांवर अन्याय होत असल्याचे सांगत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलार यांच्यावर निशाणा साधला. मुंबईतील मराठी माणसाची ही अवस्था धोक्याची घंटा असल्याचे सांगत त्यांनी रस्त्यावरचा न्याय मनसे स्टाईलने करण्याचा इशाराही दिला आहे.

या तोडफोडीच्या घटनेनंतर चेंबूर परिसरातील रहेजा यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. अट्रोसिटीच्या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी आरोपी प्रयत्न करत असल्याचे बोलले जात असतानाच, वंचित बहुजन आघाडीने मात्र अटकेशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. या घटनेमुळे आता मुंबईतील बिल्डर लॉबी आणि मराठी माणसाचा सन्मान हा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!