येथील परिसरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावर दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांसह शालेय विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिकांना महामार्ग ओलांडणे अत्यंत धोकादायक ठरत आहे.
महामार्गालगत राजा शिवछत्रपती चौक ते टोलनाका त्यादरम्यान अनेक शाळा आहेत. या महामार्गाला अद्याप सेवा रस्ता उपलब्ध नसल्याने आजूबाजूच्या परिसरातील विद्यार्थी व नागरिकांना महामार्गावरूनच ये-जा करावी लागत आहे.
टोलनाक्यापासून जय गणेश साम्राज्य चौकापर्यंत कोणत्याही वेळी सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे अशक्य झाले आहे. दुचाकी, चारचाकी तसेच जड वाहने प्रचंड वेगाने धावत असल्याने नागरिकांना ताटकळत उभे राहून जीव धोक्यात घालून भरधाव वाहतूक असलेला महामार्ग ओलांडावा लागत आहे. महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम लालफितीत अडकल्याने सध्याचा रस्ता अपुरा पडत असून, वाहनचालक मात्र बेदरकारपणे वेगात वाहने चालवत अपघातांना आमंत्रण देत आहेत.
विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना या परिस्थितीचा मोठा धोका निर्माण झाला आहे. पादचारी रस्ता ओलांडत असतानाही अनेक वाहनचालक वेग कमी न करता अरेरावीने वाहने चालवतात. प्रत्यक्षात वाहतूक नियमांनुसार रस्त्यावर पहिला हक्क पादचाऱ्यांचा असतो. मात्र, याबाबत अनेक वाहनचालक अनभिज्ञ असल्याचे चित्र दिसून येते.
वेग मर्यादा व वाहतूक नियमांची काटेकोर अंमलबजावणी झाल्यास अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल व नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा स्थानिक नागरिक व पालकवर्ग व्यक्त करीत आहेत.
पुणे-नाशिक महामार्गालगत अनेक शाळा असून, महिलावर्ग, ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थी रोज जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडत आहेत. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण, प्रादेशिक परिवहन कार्यालय व वाहतूक पोलिसांनी तातडीने या मार्गावर वेगमर्यादा निश्चित करून सूचना फलक उभारावेत, तसेच सुरक्षित पादचारी मार्ग किंवा उड्डाणपूल उपलब्ध करून द्यावा.











