मुंबई : कोकणातील पाच जिल्ह्यांतील कोळीवाड्यांच्या जमिनी अधिकृत करण्यासाठी सर्वेक्षण व सीमांकन होणार असून याकरीता कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. ही समिती पुढील तीन महिन्यात याबाबतचा अहवाल शासनास सादर करेल.
ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोळीवाड्यांचा यामध्ये समावेश आहे. कोळीवाड्यांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण करून सीमांकनासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चिती केली जाणार आहेत. पाचही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी या समितीचे सदस्य असणार आहेत. मुंबई शहर आणि उपनगरांतील कोळीवाड्यांचा यामध्ये समावेश नाही.
विशेष समिती काय काम करणार?
कोळीवाडे असलेल्या गावांची तालुकानिहाय यादी तयार करणार आहे.
समुद्राच्या भरतीची उच्चतम सीमारेषा, मेरीटाईम बोर्डाकडील सीमारेषा व कांदळवनाची सीमारेषा निश्चितीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करणार.
संबंधित पाच जिल्ह्यांतील कोळीवाड्यांचे सीमांकन करण्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करणार.
ही संपूर्ण प्रक्रिया वेळेत पार पडण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चिती करणार.
पुढील तीन महिन्यात या संबंधीचा अहवाल शासनास सादर केला जाणार.











