राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे आज (28 जानेवारी) सकाळी बारामती विमानतळावर भीषण अपघातात निधन झाले. विमानाचा अपघात झाल्यानंतर जमिनीवर कोसळल्यानंतर अक्षरश: कोळसा झाला. त्यामुळे या भयावह अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात झाला. लँडिंगच्या प्रयत्नात विमान runway च्या बाजूला जाऊन अपघातग्रस्त झाले. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. यामध्ये त्यांचे वैयक्तिक सुरक्षा अधिकारी (PSO) आणि एक अटेंडंट, तसेच दोन पायलट्स (PIC + FO) यांचा समावेश आहे. अजित पवारांचे पार्थिव बारामती वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आलं आहे.
अजित पवार यांचा बारामती दौऱ्यासाठी आज बारामतीमध्ये येणार होते. त्यांच्या आज चार सभा होणार होत्या. दरम्यान, पवार कुटुंबियांपैकी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे सर्व दिल्लीमध्ये संसदेत बजेट सत्रात होते आणि ते सध्या बारामतीकडे निघाले आहेत. या दु:खद बातमीनं महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वच पक्षांमध्ये आणि जनमानसात एक मोठी शोककळा पसरली आहे.
शरद पवार साहेबांना कसं सांगायचं?
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर शरद पवारांना सांगायचं तरी काय? असा प्रश्न पवार कुटुंबीयांसमोर होता. त्यामुळे अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची बातमी शरद पवार यांना देण्यात आली नव्हती. मेडिकल चेक अपसाठी पवार यांना रुग्णालयात नेहण्यात आले होते. पवार यांना घेऊन कुटुंबीय पुन्हा घरी आले. घरात कुटुंबियांकडून दादांच्या अपघाती निधनाची माहिती पवारांना देण्यात आली. अपघाती निधनाचे वृत्त समजताच शरद पवार बारामतीसाठी रवाना झाले आहेत.
उद्ध्वस्त’ सुप्रिया सुळेंचा भावना अन् अश्रुंचा बांध फुटला
अजित पवार यांच्या धक्कादायक आणि अकाली एक्झिटनंतर उद्ध्वस्त या एका शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी व्हाट्सअप स्टेटसच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. ‘Devastated’ या एकाच शब्दात सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे यांनी दिल्लीतून बारामतीकडे प्रस्थान केलं आहे. त्यांच्यासोबत खासदार सुनेत्रा पवार सुद्धा सोबत असल्याची माहिती आहे. अजित पवारांच्या अपघाताची बातमी येऊन धडकल्यानंतर राष्ट्रवादीसह अवघ्या महाराष्ट्रात सन्नाटा पसरला आहे. कार्यकर्त्यासह नेत्यांना सुद्धा अश्रु अनावर झाले. ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना अजित पवारांचे निधनाचे वृत समजताच त्यांना अश्रु अनावर झाले. त्यांना प्रतिक्रिया सुद्धा देता आली नाही. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनाही आम्ही पोरके झालो म्हणत अश्रु अनावर झाले.











