राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने सर्वांनाच धक्का बसला असून राज्यभर हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईहून बारामतीकडे निघालेले अजित पवार यांचे विमान बारामती विमानतळाजवळ आल्यानंतर अचानक कोसळले. विमान कोसळल्यानंतर काही क्षणांत मोठा स्फोट झाला आणि या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. अजितदादांसारख्या लोकप्रिय नेत्याच्या निधनाने त्यांच्या समर्थकांसह सर्वसामान्य जनताही शोकसागरात बुडाली आहे. अशातच त्यांच्या विमान अपघातावरून वकील नितीन सातपुते यांनी गंभीर शंका उपस्थित केली आहे.
वकील नितीन सातपुते यांनी अजित पवार यांच्या विमान अपघात ाबाबत संशय व्यक्त करताना म्हटलं आहे की, “अजित पवार यांचा विमान अपघात संशयास्पद वाटत आहे. या अपघाताची हायकोर्टाचे न्यायाधीश आणि मानवी हक्क आयोगाकडून चौकशी होण्याची गरज आहे. या विमानात खरंच काही तांत्रिक समस्या होती की जाणीपूर्वक ते नादुरुस्त ठेवण्यात आलं किंवा यामागे काही राजकीय षडयंत्र आहे का? या सगळ्याबाबतही सीबीआयकडून चौकशी व्हायला हवी,” अशी मागणी वकील सातपुते यांनी केली आहे.
विमानात कोण-कोण होतं?
अजित पवार यांच्यासह अपघातग्रस्त विमानामध्ये एकूण पाच जण होते. त्यांचे मुंबईचे सुरक्षारक्षक विदीप जाधव हे देखील सोबत होते . विमानामध्ये अजित पवार यांच्यासह विदीप जाधव (अजित पवार यांचे खासगी सुरक्षारक्षक), सुमित कपूर (पायलट कॅप्टन), संभवी पाठक (कॅप्टन) आणि पिंकी माळी (फ्लाईट अटेंडंट) हे होते.











