प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नाशिक येथे पार पडलेल्या शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने वाद निर्माण झाला आहे. या घटनेविरोधात कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याने उघडपणे संताप व्यक्त केला.
वनविभागातील महिला कर्मचारी माधवी जाधव यांनी यावेळी ठाम भूमिका घेतली. “ज्यांनी देशाला संविधान दिलं, लोकशाहीची उभारणी केली, त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात वगळणं ही मोठी चूक आहे. मला सस्पेंड केलं तरी चालेल, पण मी माफी मागणार नाही. मला वाळूच्या गाड्या उतरवायला लावल्या, मातीचं काम दिलं तरी मी ते करेन; पण बाबासाहेबांची ओळख पुसली जाऊ देणार नाही,” असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.
माधवी जाधव यांच्या या निर्भीड प्रतिक्रियेमुळे कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र या प्रकारानंतर पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली. “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव भाषणात अनावधानाने राहून गेले. यामागे कोणताही हेतू नव्हता,” असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, या घटनेचे पडसाद सामाजिक व राजकीय वर्तुळात उमटू लागले असून, प्रजासत्ताक दिनासारख्या महत्त्वाच्या कार्यक्रमात बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख होणे ही केवळ औपचारिकता नसून घटनात्मक मूल्यांची जाणीव असल्याचे अनेकांचे मत आहे.











