April 23, 2026 11:58 pm

भविष्यात सत्ताबदल अपरिहार्य; सत्ताधाऱ्यांना थेट आव्हान

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

राज्यातील सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भविष्यात सत्ताबदल अपरिहार्य असून, सत्ताधाऱ्यांना थेट (Prakash Shendge)आव्हान देण्याची ताकद ओबीसी बहुजन आघाडीकडे आहे, असा ठाम विश्वास ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी व्यक्त केला आहे. ओबीसी, दलित आणि अल्पसंख्याक समाज एकत्र आल्यास कोणताही राजकीय पक्ष त्यांच्यासमोर टिकू शकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी बहुजन आघाडीच्या माध्यमातून ताकदीने लढवण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी पत्रकार परिषदेत केली.

 

या निवडणुकांमध्ये यश मिळालं नाही, तरी पराभवातून अनुभव घेऊन पुढील काळात पुन्हा अधिक सक्षमपणे निवडणूक लढवली जाईल, असे सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हे भावी लोकप्रतिनिधी घडविण्याचे हक्काचे व्यासपीठ असल्याचे मत शेंडगे यांनी मांडले. यावेळी ओबीसी नेते मंगेश ससाणे, चंद्रकांत बावकर आणि अस्लम बागवान उपस्थित होते.

 

प्रकाश शेंडगे म्हणाले की, “ओबीसी बहुजन आघाडी या नावाने आम्ही स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन केला असून, त्याच माध्यमातून आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका लढवणार आहोत. अनेक वर्षे विविध पक्षांत प्रामाणिकपणे काम करूनही ओबीसी कार्यकर्त्यांना उमेदवारीची संधी दिली जात नाही. त्यामुळे आता ओबीसी समाजातील कार्यकर्त्यांची एकजूट करून आम्ही प्रथमच निवडणूक रिंगणात उतरत आहोत.”

 

स्थानिक स्वराज्य संस्थांमधूनच खरे नेतृत्व तयार होत असते. ओबीसी कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची प्रतीक्षा आता संपली असून, ओबीसी समाजाला त्यांचे हक्काचे राजकीय व्यासपीठ मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच सध्या अनेक प्रस्थापित पक्षांकडून बोगस कुणबी दाखल्यांच्या आधारे उमेदवार उभे केले जात असल्याचा आरोपही शेंडगे यांनी केला. ओबीसींच्या हक्काच्या जागा बळकावण्याच्या प्रकाराविरोधात न्यायालयात दाद मागणार असून, अशा उमेदवारांना निवडणुकीत पराभूत करण्यासाठीही आघाडी आक्रमक भूमिका घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाने काही ठिकाणी दबावाखाली उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कमी वेळ दिल्याचा आरोप करत, यामुळे सामान्य ओबीसी कार्यकर्त्यांवर अन्याय होत असल्याचेही शेंडगे यांनी सांगितले.

 

दरम्यान, मंगेश ससाणे यांनी पुणे महानगरपालिकेतील परिस्थितीवर बोट ठेवत गंभीर आरोप केले. “पुणे मनपामध्ये बोगस कुणबी दाखल्यांच्या आधारे अनेक जणांनी निवडणूक लढवली. यामुळे ओबीसी समाजाच्या २७ टक्के आरक्षणावर गदा आली आहे. पुणे मनपामधील ४४ ओबीसी जागांपैकी २६ जागांवर खोटे ओबीसी निवडून आले आहेत. म्हणजेच जवळपास ६० टक्के प्रतिनिधी हे बनावट ओबीसी आहेत,” असा दावा त्यांनी केला.

 

या प्रकरणाविरोधात ओबीसी बहुजन आघाडी कायदेशीर लढाई लढणार असून, ओबीसी समाजाच्या राजकीय हक्कांचे संरक्षण करण्यासाठी संघर्ष अधिक तीव्र केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसी बहुजन आघाडीच्या या घोषणेमुळे राज्याच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!