मुंबईत सध्या गुजराती, तामिळी आणि उत्तर भारतीय समाजाला मराठी लोकांपासून दूर करण्याचा डाव खेळला जात आहे. जेणेकरुन मुंबईत मराठी माणूस एकटा पडेल, असा उद्देश आहे. मात्र, आपण एकटे पडलो तरी काफी आहोत, असे वक्तव्य मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केले. ते रविवारी शिवाजी पार्क येथे आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी राज ठाकरे यांनी भाजप आणि अदानींवर टीका करणारे घणाघाती भाषण केले. या भाषणात त्यांनी मुंबईतील कबुतरखाने आणि मांसाहाराच्या मुद्द्यावरुन मराठी व जैन समाजात पेटलेल्या वादाचा उल्लेख केला.
आज मुंबईत अनेक दाक्षिणात्य, जैन आणि मारवाडी लोक राहत आहेत. ते मुंबईत आनंदाने राहतात. पण कबुतरखाने आणि मांसाहाराच्या नावाने त्यांना कशाप्रकारे भडकावले जात आहे, ते बघा. कबुतरांपेक्षा सत्ताधारीच जास्त फडफडत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईत जैन-मराठी वादावर पडदा टाकण्यासाठी एक बैठक झाली. त्यावेळी जैन धर्मगुरु निलेशचंद्र मुनी यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जैन-मराठी वाद मिटवण्याची जबाबदारी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यावर दिली होती. पण मंगलप्रभात लोढांनी हा वाद मिटवण्याऐवजी मराठी आणि जैन समाजात जास्तीत जास्त भांडणे कशी लागतील, हे पाहिले. याचा अर्थ गुजराती समाजाला मराठी माणसांपासून दूर करायचे. भाजपने के. अण्णामलाई यांना मुंबईत आणून तामिळी लोकांना दूर करण्याचा प्रयत्न केला, उत्तर भारतीयांनाही वेगळे करण्याचा प्रयत्न सुरु आहे. असे करुन तुम्हाला मराठी माणसाला मुंबईत एकटे पाडण्याचा डाव आहे. अहो आपण एकटे असलो तरी काफी आहोत. त्यामुळे कोणीही नको त्या वादात जाऊ नये, असे राज ठाकरे यांनी सांगितले.
अदानी यांचे उद्योग, बुलेट ट्रेनच्या माध्यमातून राज्यातील जमिनींवर कब्जा केला जात आहे. मुंबईतील मोक्याच्या जागांवरील जमिनी विकत घेतल्या जात आहेत. या भागातून मराठी माणसांना पद्धतशीरपणे हद्दपार केले जात आहे. मराठी माणूसच राहिला नाही तर महापालिका काय कामाची. मुंबई वाचवण्यासाठी ही शेवटची संधी आहे. सर्वपक्षीय मराठी माणसांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकत्र यावे. आता चुकलात तर कायमचे मुकाल, असे राज ठाकरे यांनी सांगितले.











