मुंबई:- मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी (11 जानेवारी) मुंबईत शिवाजी पार्क मैदानात संयुक्त सभा पार पडली. या सभेत राज ठाकरे यांनी भाजपवर गंभीर आरोप केले. भाजपकडून केवळ अदानी उद्योग समूहाला विविध प्रकल्प देण्यात आल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. तसेच आगामी काळात वाढवण बंदराजवळ विमानतळ बनवलं जाईल, मुंबईचं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईकडे वळवण्यात येईल आणि मुंबईचं सध्याचं विमानतळ अदानी उद्योग समूहाला विकत दिलं जाईल, असा आरोप राज ठाकरे यांनी केला. त्यांच्या या आरोपांवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंवर यावेळी अतिशय खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.
“मला असं वाटतं की, यापेक्षा मुर्खपणाचं दुसरं स्टेटमेंट असूच शकत नाही. मुंबईला दोन विमानतळांची गरज होती त्यामुळे दुसरं विमानतळ आम्हीच बांधलं. या मुंबईचा विकास कुठल्या एका गोष्टीने थांबला असेल तर सिंगल स्ट्रिपचे एअरपोर्ट. मुंबईत इतके वर्ष ते होतं”, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
“मुंबईच्या विमनतळाचा प्लॅन 1992 पासून झाला होता. पण कोणीच काम करु शकलं नव्हतं. तेव्हापासून केवळ पाट्या लागल्या होत्या. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सगळ्या अडचणी दूर केल्या आणि हे विमानतळ बांधलं. विमानतळ बांधलं तेव्हा उद्योगपती अदानींचं नव्हतं. याचं टेंडर जिव्हिकेला मिळालं होतं. नंतर जिव्हिकेने आपले शेअर डायलूट केले आणि अदानी यांनी ते टेकओव्हर केले. आम्ही काही अदानींना दिले नव्हते. आम्ही जिव्हिकेला दिलं होतं. चार वर्षांनी अदानींनी तो घेतला”, अशी माहिती फडणवीसांनी दिली.
त्यांना भूगोल कळत नाही. गुजरातचा तुम्ही पोर्ट बघितला तर तो चिंचोळ्या भागात आहे. तिथे विमानतळ आहे. त्या विमानतळचं ते काय करतील? याउलट वाढवण बंदराने सर्वात मोठं नुकसान गुजरातचं आहे. आजपर्यंत तिथे गुजरातचा एक पोर्ट होता. सगळा माल आपला त्या पोर्टवर यायचा. आता त्यापेक्षा दहा पटीने मोठा पोर्ट आपण केला”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.











