उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील महिलांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. राज्य सरकारने एसटी प्रवासात महिलांना दिलेल्या 50 टक्के सवलतीप्रमाणेच आता मुंबईतील बेस्ट बसमध्येही महिलांना 50 टक्के सवलत देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. ही योजना महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी असलेल्या लाडकी बहीण योजनेचाच एक भाग आहे, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.
यासोबतच मुंबईच्या विकासासाठी अनेक नवीन योजनांची माहिती त्यांनी दिली. मुंबईला प्रदूषणमुक्त करण्यासाठी 17,000 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. गेल्या 25 वर्षांपासून रखडलेले एसटीपी प्रकल्प आता पूर्ण केले जातील, ज्यामुळे समुद्रात प्रदूषित पाणी सोडणे थांबेल. तसेच, मुंबईतील रस्त्यांचे दोन टप्प्यांत काँक्रिटीकरण करून शहर खड्डेमुक्त करण्याचे आश्वासनही एकनाथ शिंदे यांनी दिले. हे सर्व वचननाम्यातील आश्वासने केवळ कागदावर राहणार नसून, त्यांची अंमलबजावणी केली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.











