पुणे, दि. २० जुलै : पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या आणि महत्त्वाच्या कात्रज–कोंढवा रस्ता रुंदीकरण प्रकल्पाबाबत महापालिका प्रशासनाने दिलेले आणखी एक आश्वासन फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे. मार्च महिन्यात महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी मेअखेर भूसंपादन पूर्ण होईल आणि जूनअखेर रस्त्याचे काम पूर्ण करून मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. मात्र जुलैचा मध्य उलटूनही भूसंपादन अपूर्ण असून रस्त्याचे कामही संथ गतीने सुरू आहे. आता प्रशासनाने हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी थेट मार्चपर्यंतची नवी मुदत जाहीर केली आहे.
या निर्णयामुळे गेली अनेक वर्षे वाहतूक कोंडी, धूळ, खड्डे आणि अपुऱ्या रस्त्यामुळे होणारा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पावसाळ्यात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांसाठीही हा मार्ग अत्यंत धोकादायक बनला आहे.
कात्रज ते खडी मशिन चौक या सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे रुंदीकरण २०१७ मध्ये सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला हा रस्ता ८४ मीटर रुंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र भूसंपादनातील अडथळे, नियोजनातील त्रुटी, प्रशासकीय दिरंगाई आणि विविध तांत्रिक कारणांमुळे प्रकल्प वारंवार रखडत गेला. परिणामी महापालिकेला पहिल्या टप्प्यात रस्त्याची रुंदी ५० मीटरपर्यंत मर्यादित करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या १०९ मिळकतींपैकी ८४ मिळकती ताब्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र उर्वरित २५ मिळकतींचे भूसंपादन अद्यापही पूर्ण झालेले नाही. टीडीआर आणि एफएसआयद्वारे भूसंपादन करताना आलेल्या तांत्रिक अडचणी, जागामालकांची रोख मोबदल्याची मागणी तसेच धोरणातील बदल यामुळे प्रकल्पाची गती मंदावल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.
महापालिकेच्या म्हणण्यानुसार एप्रिलपासून भूसंपादन प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात रस्त्यावरील कामाची गती अत्यंत संथ असल्याने नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात असंतोष वाढत आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या मुदती का पाळल्या गेल्या नाहीत, याचे समाधानकारक उत्तर प्रशासनाकडे नसल्याने नागरिकांचा महापालिकेवरील विश्वासही कमी होत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, नागरिकांनी हा प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी केली आहे. अपूर्ण कामामुळे वाहतूक कोंडी, अपघातांचा धोका आणि दैनंदिन प्रवासातील अडचणी वाढत असल्याने महापालिकेने निश्चित कालमर्यादेत काम पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आता प्रशासनाने दिलेली मार्चपर्यंतची नवी मुदत तरी पाळली जाणार का, याकडे संपूर्ण पुणेकरांचे लक्ष लागले आहे.










