राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये एकीकडे राष्ट्रीय कार्यकारिणीवरून वाद सुरू आहे, तर दुसरीकडे माजी खासदार आणि सरचिटणीस आनंद परांजपे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे. राष्ट्रवादीत राजीनामा दिल्यानंतर अवघ्या ६ तासांमध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.
शिवसेनेत एकाप्रकारे परांजपे यांची घरवापसी झाली आहे. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची साथ का सोडली. याचं कारणही सांगितलं.
माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आनंद परांजपे यांचा बाळासाहेब भवन इथं शिवसेनेत पक्ष प्रवेश पार पडला. यावेळी सेनेचे खासदार श्रीकांत शिंदे, मंत्री दादा भुसे, उदय सामंत आणि सरचिटणीस राहुल शेवाळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी आनंद परांजपेंनी आपल्या मनातली खदखद बोलून दााखवली.
“एकनाथ शिंदे यांनी आनंद दिघे यांचा वारसा पुढे नेला. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा सेनेत आलो. माझे वडील 1966 पासून शिवसेनेत होते…नगरसेवक आणि खासदार होते. बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे मी देखील संसदेत गेलो. मला एकनाथ शिंदे यांनी तिकीट मिळवून दिलं. शिंदे यांनी माझ्या प्रचाराची धुरा सांभाळली. मी पदाच्या लालसेमुळे आलो नाही.
संघटनेत काम करायचं आहे. मी राष्ट्रवादीचे देखील आभार मानतो, 2012 साली प्रवास सुरू झाला. सर्व नेत्यांचे मी आभार व्यक्त करतो. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, जय पवार, पार्थ पवार आणि जितेंद्र आव्हाड यांचे देखील आभार आहे, असं म्हणत परांजपे यांनी सगळ्यांचे आभार मानले.
“माझा DNA शिवसेनेचा आहे. शिवसेनेत मला राजकारणाचं बाळकडू मिळालं. मी मुळात नाराज नाही. पदासाठी मी इथे आलो नाही. मी सर्व जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पडल्या. राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दिकींना उमेदवारी दिली आहे, पण आता शिवसेनेत आलो म्हणून राष्ट्रवादीवर नाराजी व्यक्त करणं माझ्या रक्तात नाही. मला पदाची अपेक्षा नाही. मी राष्ट्रवादीवर कोणती टीका करणार नाही. माझा चेहरा हसमुख असतो, असं म्हणत आनंद परांजपे यांनी आपल्या मनातलं बोलून दाखवलं










