पुण्यातील भोर जिल्ह्यातील नसरापूरमध्ये घडलेल्या अत्याचाराच्या घटनेनं राज्य हादरलं. पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका साडेतीन वर्षांच्या मुलीवर एका नराधमाने अत्याचार करुन तिला ठार मारल्याची घटना 1 मे रोजी घडली होती.
या घटनेनंतर राज्यभरात संतप्त पडसाद उमटले होते. लहान मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ फाशी द्यावी, या मागणीसाठी पुण्यातील नवले पूलावर नसरापूरच्या ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले होते, या प्रकरणी राज्यात संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी काँग्रेस नेत्या आणि खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील संताप व्यक्त करत आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.
संपूर्ण महाराष्ट्रमध्ये आणि सोलापुरात कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे. महाराष्ट्रचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करतोय. शक्ती कायदा लागू करून 15 दिवसात फाशी झाली असती. उलट मुख्यमंत्री एकमेकांना काल पेढे भरवत जल्लोष केला, मुख्यमंत्री असो किंवा पंतप्रधान यांना केवळ निवडणुका महत्वाच्या आहेत. तुम्ही त्या चिमुकलीची आठवण ठेवून जल्लोष साजरा करायला नको होता. माणुसकी यांच्यात राहिलेली नाही, नैतिक जबाबदारी स्वीकारून तुम्ही स्वतःहून राजीनामा द्यायला हवा. सोलापुरात दिवसा ढवळ्या लोकांच्या हत्या होत आहेत. महाराष्ट्रमध्ये कायदा आणि सुव्यवस्था कुठे आहे, महाराष्ट्रमध्ये कायदा आणि सुव्यवस्था परिस्थिती बिघडलेली आहे. पॉक्सोच्या अंतर्गत अनेक मुली गर्भवती झाल्या, या मुलींची ओळख जाहीर करता येतं नाही, पण डॉक्टरांनी ही माहिती पब्लिक डोमेनवर उपलब्ध करून दिली, मुलींच्या बाबतीत या अशा घटना होतायत असंही पुढे प्रणिती शिंदे यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री महोदयांना पण मुलगी आहे, आपण या घटनेकडे ज्यावेळी बघतो, त्यावेळी अंगावर शहरे येतात. विकृत मानसिकता वाढत जातेय, वरपासून खालीपर्यंत यांना समर्थन मिळतं. अशा लोकांना वाव मिळतो म्हणून विकृती वाढतेय. या व्यक्तीवर या आधी दोन वेळा गुन्हे दाखल होते मग हा सुटला कसा? कोणी सोडलं याला? मुलीच्या तोंडात सॉक्स कोंबन्यात आलेलं होतं, कारण ती आवाज करू नये म्हणून, ही घटना इतकी गंभीर असताना मुख्यमंत्री मजा करत फिरतायत, वरपासून खालीपर्यंत सर्वांना बदललं पाहिजे, ताबडतोब राजीनामे व्हायला पाहिजे आणि नराधमला फाशी झाली पाहिजे, अशी मागणी देखील प्रणिती शिंदेंनी केली आहे.











