महापालिकेच्या नियोजित दुरुस्ती कामांदरम्यान मुख्य जलवाहिनीवर फ्लो मीटर बसविण्यात झालेल्या विलंबामुळे पुणेकरांना सलग दुसऱ्या दिवशीही पाणीटंचाईचा सामना करावा लागला. गुरुवारी घेतलेल्या क्लोजरनंतर शुक्रवारी सकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणे अपेक्षित होते; मात्र काम उशिरा पूर्ण झाल्याने दुपारपर्यंत शहरातील अनेक भागात पाणी पोहोचले नाही.ऐन उन्हाळ्यात दोन दिवस पाणी न आल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
शहरातील जलकेंद्र, पाइपलाइन दुरुस्ती, फ्लो मीटर बसवणे अशा सुमारे 41 कामांसाठी गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवला होता. नियोजनानुसार शुक्रवारी सकाळी पुरवठा सुरू होणे अपेक्षित होते; मात्र सकाळी नऊनंतरही नळ कोरडेच राहिल्याने नागरिकांनी नगरसेवक आणि अधिकाऱ्यांकडे तक्रारींचा पाऊस पाडला. टँकरसाठीही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली.
दरम्यान, सर्वसाधारण सभेत नगरसेवक कुणाल टिळक यांनी पाणीबाणीचा मुद्दा उपस्थित केला. यावर अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, खडकवासला ते पर्वती जलकेंद्र या मुख्य वाहिनीवर फ्लो मीटर बसविताना जागेवरील तांत्रिक अडचणींमुळे सुमारे 5 ते 6 तास विलंब झाला. हे काम दुपारी तीनपर्यंत पूर्ण होईल, तसेच लष्कर, कोथरूड, औंध आणि नाना पेठ भागात त्यानंतर पाणीपुरवठा सुरू करण्यात येईल.
उर्वरित भागात कालव्यातून पाणी उचलण्याची प्रक्रिया सुरू असून, दुपारी बारा वाजल्यानंतर टप्प्याटप्प्याने पुरवठा सुरू करण्यात येईल, अशी माहितीही त्यांनी दिली. मागील 24 तास पाणीपुरवठा बंद असल्याने दुपारनंतर सुरू झालेला पुरवठा रात्री उशिरापर्यंत कायम ठेवण्यात आला.
महापालिकेने या वेळी एकूण 45 देखभाल कामे पूर्ण केली असून, खडकवासला ते पर्वतीदरम्यानच्या 2000 मि.मी. व्यासाच्या मुख्य पाइपलाइनवर प्रथमच फ्लो मीटर बसविण्यात आला आहे. या मीटरमुळे भविष्यात पाणी गळतीचे अचूक ठिकाण शोधणे आणि त्यावर उपाययोजना करणे अधिक सुलभ होणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.










