महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत विविध जलशुद्धीकरण केंद्र तसेच मुख्य जलवाहिन्यांवरील अत्यंत महत्त्वाची तांत्रिक आणि देखभाल दुरुस्तीची कामे शुक्रवारी पूर्ण करण्यात आली आहेत.शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम, कार्यक्षम आणि दीर्घकालीन दृष्टीने टिकाऊ करण्यासाठी ही कामे अत्यंत महत्त्वाची आहेत.
शहरात गुरुवारी विविध कामांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. मात्र, ही कामे लांबल्याने दुपारनंतर देखील पाणीपुरवठा सुरळीत झाला नव्हता. याचे पडसाद महापालिका सभागृहात देखील दिसून आले होते. ही कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश महापौर मंजूषा नागपुरे यांनी दिले होते. पाणीपुरवठा विभागामार्फत विविध जलशुद्धीकरण केंद्र तसेच मुख्य जलवाहिन्यांवर महत्त्वाची कामे पूर्ण करण्यात आली.
खडकवासला धरणाच्या आउटलेटवरील 3000 मिमी व वारजे जलवाहिनीवरील 1600 मिमी क्षमतेचे दीर्घकाळ निकामी असलेले मुख्य व्हॉल्व्ह बदलण्यात आले आहेत. यामुळे भविष्यात संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा बंद न करता स्थानिक पातळीवर दुरुस्ती करणे शक्य होणार आहे. तसेच, पर्वती व भामा-आसखेड जलशुद्धीकरण केंद्रांवर आधुनिक ’इनलेट वॉटर मीटर’ बसविण्यात आले असून, यामुळे पाणी वापर, गळती व वितरणाचे अचूक मोजमाप होणार आहे. महावितरण व महापालिकेच्या समन्वयातून पाच प्रमुख केंद्रांवर 45 हून अधिक तांत्रिक व नागरी कामेही पूर्ण करण्यात आली आहेत.
सर्व नियोजित कामे दुपारी पूर्ण झाल्यानंतर पंपिंग स्टेशन टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात आली. दरम्यान, पर्वती परिसरातील कालव्याच्या गळतीमुळे काही अडथळा निर्माण झाला होता. मात्र, सिंचन विभागाच्या मदतीने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. सर्व पंपिंग स्टेशन पूर्णक्षमतेने सुरू ठेवणे, गळती त्वरित दुरुस्त करणे आणि आवश्यकतेनुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मुख्य जलवाहिन्या व टाक्या रिकाम्या झाल्यामुळे पाणीपुरवठा पूर्ण दाबाने सुरू होण्यासाठी 3 ते 4 तासांचा कालावधी लागू शकतो. औंध, कोथरूड, एरंडवणे व पेठ भागात आज रात्रीपर्यंत कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता असून, नागरिकांनी संयम राखण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.










