पारधी समाजातील युवकाने जिद्दीने पोलिसपदापर्यंत झेप घेतली आहे. ‘मारो गोळीव पोलिस होई गयो..!’ अशी भावनिक प्रतिक्रिया त्याच्या आई-वडिलांनी दिली.इंदर शंकर पवार असे त्या जिद्दी तरुणाचे नाव आहे.
इंदर पवार हा भोसे (ता. मिरज) येथील. आई, वडील, दोन भाऊ असे त्याचे कुटुंब. आई-वडील घरोघरी धान्य मागून कुटुंबाची गुजराण करतात. हातावर पोट घेऊन जगताना पावलोपावली अपमान सहन करत हे जगत होते. त्याने सन्मानाने जगण्यासाठी शिक्षणाचे शस्त्र हाती घेतले.
पहिल्यांदा कवठेमहांकाळ येथील शासकीय वसतिगृहात तो राहू लागला. त्याठिकाणी दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्याने भोसे हायस्कूलमध्ये अकरावी-बारावीचे शिक्षण घेतले.
२०२३ पासून तो पारधी वस्ती सोडून गावातील ग्रामपंचायत करिअर ॲकॅडमीत शिकू लागला. त्याला काहीही करून पोलिस व्हायचेच होते. ॲकॅडमीचे मार्गदर्शक अनिल शिंदे, तंटामुक्ती गाव समिती माजी अध्यक्ष वैभव चव्हाण यांनी इंदर याला मदतीचा हात दिला. भोजन आणि निवासाची व्यवस्था केली. मग, त्याने रात्रंदिवस पुस्तकांशी मैत्री करून मैदानी सरावात स्वतःला झोकून दिले.
२०२४ मध्ये मुंबई पोलिस भरतीसाठी तो मैदानात उतरला. त्यावेळी त्याला १२० गुण मिळाले. अवघ्या तीन गुणांत त्याला अपयश आले. मात्र त्याने जिद्द सोडली नाही. १५ मार्च २०२६ मध्ये सांगलीत पोलिस भरतीसाठी जिद्द पणाला लावली. त्याला १३१ गुण मिळाले आणि सांगली पोलिस दलात तो भरती झाला.
निकाल लागला आणि हा तरुण पोलिस झाल्याची बातमी वस्तीत पोहोचली, तेव्हा संपूर्ण भोसे गाव गहिवरून गेले. इंदर आजच पोलिस मुख्यालयात हजर झाला. इथून पुढे नऊ महिने तो प्रशिक्षण पूर्ण करणार असून त्यानंतर तो सेवेत रुजू होईल. त्याला आज सोडण्यासाठी समाज बांधव आले होते. आई-वडिलांच्या डोळ्यांत पाणी आले. ‘मारो गोळीव पोलिस होई गयो’ इतकेच ते बोलत होते. पोलिस दलालाही या इंदरचा मोठा अभिमान आहे.
आता पुढील शिक्षण मी घेणार आहे. त्यानंतर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरूच ठेवणार आहे. अधिकारी होण्याचे स्वप्न आहे. माझ्या या प्रवासात भोसेकरांनी मोठी साथ मला दिली.










