बीडच्या तरुणीने सोलापूरमध्ये आत्महत्या केली. कुजलेल्या अवस्थेत या तरुणीचा मृतदेहा सापडला. बॉयफ्रेंड आणि त्याच्या आईच्या त्रासाला कंटाळून या तरुणीने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिस तपासातून समोर आले. या प्रकरण पोलिसांनी दोघांविरोधात गु्न्हा दाखल करत त्यांना अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोलापुरात बॉयफ्रेंड आणि त्याच्या आईच्या जाचाला कंटाळून तरुणीने आत्महत्या केली. बार्शी तालुक्यातील तुर्कपिंपरी शिवारात २९ जानेवारी रोजी कुजलेल्या अवस्थेत या तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणाचा तपास करत असताना धक्कादायक माहिती समोर आली. हा मृतदेह बीड जिल्ह्यातील १७ वर्षीय मुलीचा असल्याचे पोलिस तापासातून समोर आले.
अश्विनी गाढवे असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव होते. परभणी येथे राहणाऱ्या अभिषेक बांगर या तरुणासोबत पुण्यातल्या एका कंपनीत अश्विनीची ओळख झाली होती. त्यातूनच ती कामानिमित्ताने माढा तालुक्यातील एका साखर कारखान्यावर ऊसतोड कामगार म्हणून काम करण्यासाठी आली होती. त्या ठिकाणी अभिषेकसोबत त्याची आई सरोजाबाई बांगर हे ऊस तोडीचे काम करत होते. त्यामुळे तिघेजण मिळून त्या कारखान्यावर ऊसतोड कामगार म्हणून काम करत होते.
मात्र अल्पवयीन असणाऱ्या मुलीला ऊस तोडीचे काम जमत नव्हतं. ती सतत मोबाईलवर बोलत होती. त्यातून अभिषेक आणि सरोजाबाई तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देत होते. यातूनच अश्विनीने १४ जानेवारी रोजी ऊस तोडणीच्या खोपीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. अश्विनीने आत्महत्या केली हे कुणालाच कळू नये यासाठी अभिषेक आणि त्याची आई सरोजाबाई यांनी अश्विनीचा मृतदेह बैलगाडी टाकून बार्शी तालुक्यातील तुर्क पिंपरी गावातील शेतामध्ये खड्डा खांदून पुरला होता.
मात्र शिवारातील कुत्रे आणि इतर प्राण्यांनी तो मृतदेह उकरून बाहेर काढल्यामुळे प्रकरण समोर आले. तरुणीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मृतदेहाच्या पायात असलेल्या पैंजणावरून अश्विनीच्या वडिलांनी तिची ओळख पटवली. याप्रकरणी अश्विनीचा बॉयफ्रेंड अभिषेक बांगर आणि सरोजबाई यांच्याविरोधात बार्शी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.











