राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचे बुधवारी सकाळी झालेल्या विमान अपघातात निधन झाले. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला असून राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातून तीव्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रशासनावर मजबूत पकड, निर्णयक्षम नेतृत्व आणि कामातून बोलणारा नेता हरपल्याची भावना सर्वसामान्यांपासून राजकीय वर्तुळापर्यंत व्यक्त होत आहे. या दुर्दैवी घटनेनंतर राज्य शासनाकडून एक दिवसाची शासकीय सुट्टी तर तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
दरम्यान, विमान अपघाताच्या साधारण अर्धा तास आधी अजित पवार यांनी आमदार राणाजगजितसिंह पद्मसिंह पाटील यांच्याशी फोनवर संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. स्वतः राणाजगजितसिंह पाटील यांनी याबाबत भावनिक शब्दांत प्रतिक्रिया दिली.
“आजचा दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत वेदनादायक दिवसांपैकी एक आहे. काका म्हणूनच नव्हे, तर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशा दाखवणारे, धीर देणारे आणि संकटात खंबीर राहायला शिकवणारे व्यक्तिमत्त्व आज आपल्यातून निघून गेले,” अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
ते पुढे म्हणाले की, लहानपणापासून राजकारण, समाजकारण आणि जबाबदारी यांचा खरा अर्थ अजित पवार यांनी कृतीतून शिकवला. शब्दांपेक्षा कामावर विश्वास ठेवणं, निर्णय घेताना लोकहित डोळ्यांसमोर ठेवणं हे सगळं त्यांच्या सहवासातून शिकायला मिळालं. व्यक्तिगत नात्याच्या पलीकडे ते कायम मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान राहिले.
“अपघाताच्या काही वेळ आधीच फोनवर बोलणं झालं होतं. नेहमीप्रमाणे आपुलकीने चौकशी करणारा तो आवाज अजूनही कानात घुमतो आहे. आणि अवघ्या अर्ध्या तासात ही दुर्दैवी बातमी समजली. त्या क्षणी काय वाटलं, ते शब्दांत मांडणं कठीण आहे,” असंही राणाजगजितसिंह पाटील म्हणाले.
या घटनेमुळे केवळ एका कुटुंबाचं नाही, तर संपूर्ण राज्याचं मोठं नुकसान झाल्याचं सांगत त्यांनी शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी झटणारा कृतिशील नेता हरपल्याची भावना व्यक्त केली.
“त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणं कठीण आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो,” अशा शब्दांत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.











