प्रचार दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला. बारामतीमध्ये उतरण्यापूर्वीच विमान कोसळले आणि मोठा स्फोट झाला. यात अजित पवार यांच्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. अजित पवारांच्या मृत्युने महाराष्ट्रावर शोककळा पसरली. अजित पवारांना वेगवेगळ्या प्रकरणांवरून घेरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनाही मोठा धक्का बसला. हे खूप चुकीचे घडले, असे म्हणत दमानिया भावूक झाल्या.अजित पवारांच्या निधनाचे वृत्त कळल्यानंतर अंजली दमानियांनी ‘हे स्वीकारणंच शक्य होत नाही’, असे म्हणत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“हे खूप चुकीचे घडले”
अंजली दमानिया म्हणाल्या की, “डोकं खूप खूप सुन्न झाला ऐकून! विश्वासच बसत नाही. अजित पवारांविरोधात मी जिवापाड लढले आणि ते जन्मभर लढले असते. पण हे खूप खूप चुकीचे घडले. पण हे… हे इतकं धक्कादायक आहे की स्वीकारणंच शक्य होत नाही. खूप धक्का बसला आहे”, अशा शब्दात दमानियांनी दुःख व्यक्त केले आहे.
महाराष्ट्रच्या पुरोगामी गडाचा एक खंबीर बुरुज आज कोसळला
केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपाई (आ)चे अध्यक्ष रामदास आठवले यांनीही शोक व्यक्त केला आहे.
रामदास आठवले म्हणाले, “आज माझे मन खूप हेलावले आहे. अजित पवार म्हणजे राजकारणातला एक ‘पॉवरफुल’ नेता, ज्यांच्या शब्दाला वजन होते आणि निर्णयाला धार होती. दादांचा प्रशासकीय धडाका आणि वेळेचे पालन हे सर्वांसाठीच आदर्श होते. ते स्पष्टवक्ते होते, मनात काहीही न ठेवता जे आहे ते तोंडावर बोलायचे. अशा या रोखठोक नेत्याचे जाणे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका धगधगत्या पर्वाचा अंत आहे”, असे भावना रामदास आठवलेंनी व्यक्त केल्या.
“महाराष्ट्र हा पुरोगामी विचारांचा गड आहे आणि या गडाचा एक खंबीर बुरुज आज कोसळला आहे. दादांनी नेहमीच दलित, कष्टकरी आणि वंचितांच्या प्रश्नांवर आपली ठोस भूमिका मांडली. रिपब्लिकन चळवळीबद्दल त्यांच्या मनात नेहमीच आपुलकी होती. सत्तेत असो वा विरोधात, त्यांचा शब्द हा अंतिम असायचा. त्यांच्या कार्याचा वारसा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही”, अशा शब्दात रामदास आठवलेंनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.











