भारतीय रेल्वेची वंदे भारत ट्रेन दिवसेंदिवस अधिकाधिक लोकप्रिय होत आहे. प्रवाशांचा प्रतिसाद वाढताना दिसत आहे. गेल्या सुमारे ६ वर्षांच्या कालावधी तब्बल ७ कोटींहून अधिक प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद लुटला आहे. भारतीय रेल्वेचा चेहरामोहरा बदलणारी वंदे भारत ही केवळ एक ट्रेन नाही तर ती आत्मनिर्भर भारताचे प्रतीक बनली. परंतु, वंदे भारत ट्रेनबाबत अनेक मजेशीर घटना घडत असतात. अत्याधुनिक ट्रेनबाबत लोकांना उत्सुकता असली तरी त्यातील अनेक गोष्टींमुळे प्रवाशांना मनस्तापही सहन करावा लागतो.
आताच्या घडीला वंदे भारत ट्रेनच्या सुमारे १६४ सेवा देशभरात प्रवाशांना सेवा देत आहेत. अनेकदा वंदे भारत ट्रेनचे स्वयंचलित दरवाजे बंद झाल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. काही घटनांमध्ये स्वयंचलित दरवाजे बंद झाल्यामुळे काही लोक वंदे भारत ट्रेनमध्ये अडकून पडले. त्यांना तिकिटाचे पैसेही भरावे लागले आणि अनेक तासांच्या प्रवासानंतर सुटका झाली. तर अनेक घटनांमध्ये प्रवाशांना स्टेशनवर पोहोचायला उशीर झाल्यामुळे तसेच स्वयंचलित दरवाजांमुळे ट्रेन डोळ्यासमोरून गेल्याचे पाहायला मिळाले. सोशल मीडियावर याबाबतचे अनेक व्हिडिओ, पोस्ट व्हायरलही होत असतात.
स्वयंचलित दरवाज्यांपासून वाढता धोका अन् प्रवाशांना इशारा
वंदे भारत ट्रेनचे दरवाजे स्वयंचलित असतात. स्टेशनवर थांबल्यानंतर काही मिनिटांतच ते आपोआप बंद होतात. म्हणून, जर कोणी फक्त प्रवाशाला सोडण्यासाठी किंवा नेण्यासाठी ट्रेनमध्ये चढले तर तो अडकण्याचा धोका असतो. रेल्वे नियमांनुसार, तिकिटाशिवाय ट्रेनमध्ये चढणे हा दंडनीय गुन्हा आहे. वंदे भारत सारख्या मर्यादित थांबे असलेल्या ट्रेनमध्ये, ही चूक प्रवाशांना महागात पडू शकते. कारण जर दरवाजे बंद झाले तर पुढचे स्टेशन बरेच दूर असू शकते. व्हायरल व्हिडिओने प्रवाशांना सतर्क राहण्याचे आणि रेल्वे नियमांचे पालन करण्याचे महत्त्व शिकवल्याचे म्हटले जात आहे.
विनातिकीट वंदे भारत ट्रेनमध्ये चढले आणि फसले
सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये काही लोक विनातिकीट वंदे भारत एक्सप्रेसमध्ये चढताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ बिहारमधील असल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओमध्ये वैध तिकिटे नसतानाही ट्रेनमध्ये अनेक पुरुष आणि महिला चढल्याचे पाहायला मिळत आहे. व्हिडिओ व्हायरल होताच, वंदे भारत ट्रेनच्या नियमांबद्दल चर्चा सुरू झाल्याचे म्हटले जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये, एका रेल्वे कर्मचारी विनातिकीट चढलेल्या गावातील काही महिला आणि पुरुष प्रवाशांना ताबडतोब उतरण्यास सांगत असून, लगेचच उतरला नाही तर रेल्वेचे दरवाजे बंद केले जातील, असे सांगताना दिसत आहे. त्यातील एकाने त्या प्रवाशांना माहिती दिली की, वंदे भारत ट्रेनच्या विना तिकीट प्रवासावर ₹५,००० पर्यंत दंड आकारला जातो. ही माहिती कळताच, प्रवाशांना भीती वाटली आणि ते लगेचच लगबगीने वंदे भारत ट्रेनमधून खाली उतरल्याचे या व्हायरल व्हिडिओत दिसत आहे.











