कल्याणमध्ये एक भयंकर घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हळदी समारंभात जेवण केल्यानंतर 40-50 पाहुण्यांना विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.या घटनेमुळं कुटुंबीयांवर लग्न रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे. याप्रकरणी संबंधित कॅटर्सवर गुन्हा दाखल करुन त्यांना तातडीनं अटक करण्याची मागणी कुटुंबीयांकडून केली जात आहे.विषबाधा झालेल्या लोकांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लग्न रद्द झाल्याने वधूला मोठा मानसिक धक्का बसला आहे. वधूच्या वडिलांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर राज विलास पराते (कॅटर्स) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुठे घडला हा भयानक प्रकार?
याबाबच सविस्तर माहिती अशी की, कल्याण पश्चिमेतील मोहन प्राईड या हाय प्रोफाईल सोसायटीतील रहिवासी संजित बाविस्कर यांच्या मुलीचं आज लग्न होतं. काल हळदी सभारंभ होता.हळदी सभारंभ उत्साहात सुरु होता.त्याचदरम्यान पाहुणे मंडळी जेवण करत होते. हळदी समारंभ संपताच पाहुणे रुमवर पोहोचले. पण त्यानंतर त्यांना उलट्या आणि जुलाब झाले.हळदी समारंभातील जेवणातून त्यांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्या काही लोकांना अंबरनाथ,मुरबाड आणि कल्याणच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
कॅटर्सच्याही काही लोकांना विषबाधा
कॅटर्सच्याही काही लोकांना विषबाधा झाली आहे. धक्कादायक म्हणजे वधूची आई रेखा आणि बहिणीलाही विषबाधा झाली आहे. वधूला या घटनेचा जबर मानसिक धक्का बसल्याने आजचे लग्न रद्द करण्याची वेळ बाविस्कर कुटुंबियांवर आली आहे. वधूचे वडिल संजित बाविस्कर यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. कॅटर्स विरोधात गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला लवकरात लवकर अटक करावी, अशी मागणी केली आहे. या घटनेमुळे कल्याममध्ये एकच खळबळ उडाली आहे.











