राज्यात 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान (Municipal Corporation Election 2026) होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. महापालिकांच्या निवडणुकीच्या मतदासाठी काही तास शिल्लक असताना मुंबईतील निवडणूक विभागाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या प्रचाराचा कालावधी संपल्यानंतरही मुंबईतील उमेदवाराला घरोघर प्रचार करण्याची मुभा दिली आहे. या अजब निर्णयाबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.
निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचाराचा कालावधी 13 जानेवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत आहे. मात्र याचदरम्यान निवडणूक आयोगाने एक मोठा निर्णय घेतला आहे. प्रचार कालावधी संपल्यानंतरही मुंबई महानगरपालिकेतील उमेदवाराला घरोघर प्रचार करण्यास निवडणूक आयोगाने परवानगी दिली आहे. त्यामुळे प्रचाराची मुदत संपल्यानंतरही उमेदवारांना घरोघर जाऊन प्रचार करता येणार आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी कृष्णा जाधव यांनी महानगरपालिकेच्या ए, बी आणि ई विभागातील सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांची नुकतीच एक बैठक घेतली होती. त्या बैठकीच्या इतिवृत्तामध्ये हा अजब निर्णय नमूद आहे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांना 13 जानेवारीला सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. परंतु त्यानंतरही 15 जानेवारीपर्यंत ते घरोघरी जाऊन प्रचार करू शकतील, मात्र त्यांना कोणत्याही प्रकारची पत्रके वाटता येणार नाहीत, असे इतिवृत्तामध्ये नमूद आहे. याशिवाय बैठकीत घेतलेल्या इतर निर्णयांचाही त्यात समावेश आहे.
राज्यात पहिल्यांदाच घडणार-
निवडणूक आयोगाची महापालिका निवडणूक प्रचाराची वेळ 13 जानेवारी रोजी सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाने 13 ते 15 जानेवारी दरम्यान पत्रके न वाटता घरोघरी जाऊन प्रचाराला परवानगी दिली आहे. राज्यभरत हे प्रथमच घडत आहे. कोणत्याही निवडणुकीचा प्रचार 48 तास आगोदर संपतो. त्यामुळे निवडणूक आयोगाने घेतलेलाहा निर्णय वादग्रस्त ठरण्याची शक्यता आहे.











