पुणे:- माजी मंत्री तानाजी सावंत यांचे चिरंजिव गिरीराज सावंत हे पुण्यात निवडणुकीच्या रिंगणात आहे. प्रभाग क्रमांक 37 मधून ते शिवसेनेचे उमेदवार आहेत. त्यांच्यासाठी आता मराठा समाज एकवटला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात पाठीशी उभे राहणार्या, आत्महत्या केलेल्या कुटुंबाला आर्थिक सहाय्य करणार्या आणि मराठा समाजासह सर्वच समाजातील गरजूंना मदतीचा हात देणाऱ्या माजी मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून त्यांचे पुत्र गिरीराज सावंत यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन सकल मराठा समाजाचे नेते गंगाधर काळकुटे यांनी पुण्यात केले. ज्या हातांनी संकटकाळात समाजाला सावरले, त्या हातांना बळ देणे हे आपले कर्तव्य आहे. गिरीराज सावंत यांचा विजय हा केवळ एका उमेदवाराचा विजय नसून तो समाजसेवेचा विजय असेल, असेही काळकुटे म्हणाले.
तानाजी सावंत यांनी महाराष्ट्रात समाजसेवेचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे. तोच वारसा त्यांचे पुत्र गिरीराज सावंत पुढे नेत आहेत. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन आणि समाजाप्रती असलेल्या त्यांच्या संवेदनशीलतेचा विचार करून, सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांना या निवडणुकीत खंबीर पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे. मराठा आरक्षण चळवळीत आणि समाजाच्या कठीण काळात सावंत कुटुंबीय खंबीरपणे पाठीशी उभे राहिले आहेत. आता समाजाची ही जबाबदारी आहे अशा संवेदनशील आणि कार्यक्षम नेतृत्वाच्या पाठीशी आपण उभे राहावे, असं म्हणत त्यांनी पाठिंबा दर्शवला आहे.











