पाणी योजनेच्या कंत्राटदाराला मुख्य जलवाहिनी टाकताना एअरव्हॉल्व्ह बसवण्याचा विसर पडला. त्यावेळी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या चाचणीतही ही बाब लक्षात आली नाही.नंतर चाचणी घेताना जलवाहिनीवर जागोजागी एअरव्हॉल्व्ह बसवले.
मात्र, आता त्याचे वेल्डिंग निखळल्याने जलवाहिनीला गळती लागली. ती थांबविण्यासाठी तातडीने जलवाहिनी रिकामी करून काम सुरू केले; परंतु, जलवाहिनीत पाणी असल्याने वेल्डिंग करण्यास उशीर होत आहे. त्यामुळे सोमवारी (ता. १८) दुपारनंतर जलवाहिनीतून पाणी पुढे सरकेल, असे सूत्रांनी सांगितले.
मुख्य जलवाहिनीच्या चाचणीनंतरही अंतर्गत कामे अपूर्ण असल्याने वाहीत पाणी आलेले नाही. त्यामुळे उच्च न्यायालयाने नवीन योजनेतून शहराला १२ जूनपर्यंत पाणी पुरवठा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर कंपनीने कामाला गती दिली. जंक्शनची पंपिंग सुरू करून मुख्य जलवाहिनीतून नक्षत्रवाडी येथे पाणी आणले.
त्यानंतर जलवाहिनीची स्वच्छता करताना विडकीन जवळील साईमंदिराजवळ अचानक जलवाहिनीतून पाणी चेक लागल्याने तातडीने पाणी बंद करावे लागले. त्यानंतर त्या भागातील जलवाहिनी रिकामी करण्यात आली. सुरुवातीला जलवाहिनीची वेल्डिंग निखळण्याचे निदर्शनास आले; परंतु, बारकाईने तपासले असता मुख्य जलवाहिनीवर एअरव्हॉल्व्ह बसवण्यासाठी होल करण्यात आले. या होलला केलेली वेल्डिंग निखळल्याचे दिसून आले.
जलवाहिनीवरील एअरव्हॉल्व्हचे होल बंद करण्यासाठी रविवारी (ता. १७) बाहेरून वेल्डिंग केली; परंतु, जलवाहिनीत पाणी असल्याने आतून वेल्डिंग करता आली नाही. सोमवारी (ता. १८) सकाळी आतून वेल्डिंग केली जाईल. त्यानंतर, दुपारी जलवाहिनीतून पुढे पाणी आणण्यात येईल.
मुख्य जलवाहिनीतून पाणी आणताना एका कंपनीजवळील स्कॉरव्हॉल्व्हमधून पाणी सोडले जाईल. तसेच, निर्झरी नर्सरीजवळदेखील स्कॉरव्हॉल्व्हमधून पाणी सोडून जलवाहिनीची स्वच्छता केली जाईल. त्यानंतरच नक्षत्रवाडीतील जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणी आणले जाणार आहे.











