मालवण-दांडी समुद्रात वॉटरस्पोर्ट्सचा आनंद घेताना एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. बनाना राईड करताना समुद्रात पडून मुंबईच्या अंबरनाथ येथील रहिवासी असलेल्या शीतल शशिकांत मठकर (४५) या महिला पर्यटकाचा जागीच मृत्यू झाला.रविवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल मठकर या त्यांच्या पती, मुलगा, दीर आणि भावजय अशा नऊ जणांच्या कुटुंबासह शुक्रवारी मालवण-देवबाग येथे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी आल्या होत्या. देवबागमधील एका कॉटेजमध्ये त्यांचा मुक्काम होता. दोन दिवस विविध पर्यटन स्थळांना भेटी देऊन शनिवारीच त्यांनी दिराचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला होता.
रविवार दिवस मठकर कुटुंबावर आघात करणारा ठरला. सकाळी संपूर्ण कुटुंब मालवण-दांडी किनारी वॉटरस्पोर्ट्ससाठी गेले. बनाना राईडचा आनंद घेत असताना अचानक ताबा सुटून शीतल या समुद्राच्या पाण्यात पडल्या. पाण्यात पडताच त्यांची प्रकृती कमालीची खालावली. तिथेच पर्यटनासाठी आलेल्या एका डॉक्टरने प्रसंगावधान राखत त्यांच्यावर तात्काळ प्राथमिक उपचार केले. मात्र, शरीराची कोणतीही हालचाल न झाल्याने त्यांना तातडीने शहरातील एका खाजगी रुग्णालयात व त्यानंतर मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी पाटील यांनी तपासणी अंती उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
शीतल यांच्या अचानक जाण्याने पती आणि मुलाने रुग्णालयातच एकच टाहो फोडला. या प्रकरणी मालवण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून स्थानिक पोलीस तपास करत आहेत.











