इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या पहिल्या दिवशी इंग्रजी विषयाचा पेपर देण्यापूर्वी मानसिक तणाव निर्माण झालेल्या एका विद्यार्थ्याला पुणे दामिनी पथक व पुणे शहर पोलिसांनी मार्गदर्शन केले.
तत्काळ समुपदेशन आणि सकारात्मक मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढला व तणावातून बाहेर पडत तो उत्साहाने आणि शांत मनाने परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रात दाखल झाला.
आज सकाळी सुमारे साडेसहाच्या सुमारास दामिनी पथकातील कर्मचारी सोनाली हिंगे यांना एका विद्यार्थ्याचा फोन आला. फोन करणाऱ्या विद्यार्थ्याने स्वतःचे नाव विराज (नाव बदललेले) असल्याचे सांगितले. आज बारावी बोर्ड परीक्षेचा पहिला पेपर आहे. मात्र मला पेपर लिहिण्याची भीती वाटत आहे. त्यामुळे मी पेपर लिहू शकणार नाही, तसेच नापास होण्याची भीती वाटत आहे, असे त्याने फोनवर सांगितले.
ही बाब गांभीर्याने घेत दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांनी तत्काळ विद्यार्थ्याचे समुपदेशन केले. त्याला शांत करण्याचा प्रयत्न करत, परीक्षेबाबतची वस्तुस्थिती समजावून सांगण्यात आली. त्याने वर्षभर नियमित अभ्यास केलेला असून, शांत मनाने प्रश्नपत्रिका सोडविल्यास तो नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास दिला.
सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त केले –
स्वतःवर आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवण्याचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्याला सकारात्मक विचार करण्यास प्रवृत्त करण्यात आले. या समुपदेशनानंतर विद्यार्थ्याच्या मनातील भीती व तणाव मोठ्या प्रमाणात कमी झाला. त्यानंतर त्याला आत्मविश्वासाने परीक्षा केंद्रात जाण्यास प्रोत्साहित करण्यात आले.
त्यानुसार तो विद्यार्थी परिक्षेला केला. या वेळी दामिनी पथक व शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्यावतीने विद्यार्थ्याला परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. वेळेवर मिळालेल्या मानसिक आधारामुळे विद्यार्थी आत्मविश्वासाने परीक्षा देण्यासाठी सज्ज झाल्याचे दामिनी पथकाच्या वतीने सांगण्यात आले.











