डोंबिवली शहरातील उच्चभ्रू पलावा परिसरातील ऑर्किड सोसायटीमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडलीय. शाळेत जाण्यासाठी निघालेल्या एका 7 वर्षीय मुलीवर भटक्या कुत्र्यांच्या टोळक्याने हल्ला केला.
एका सतर्क सुरक्षारक्षकाच्या धाडसामुळे या चिमुरडीचे प्राण वाचले आहेत. या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
नेमकं काय घडलं?
नेहमीप्रमाणे ही मुलगी शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडली होती. त्यावेळेस सोसायटीच्या आवारात दबा धरून बसलेल्या चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी अचानक तिच्यावर मागून हल्ला चढवला. कुत्रे अंगावर धावून आल्याचे पाहून घाबरलेली मुलगी स्वतःचा बचाव करण्यासाठी पळू लागली. पण यामुळे कुत्रे अधिकच हिंसक झाले आणि त्यांनी तिचा पाठलाग सुरू केला.
सुरक्षारक्षक बनला देवदूत
कुत्र्यांच्या हल्ल्याने भयभीत झालेली मुलगी जीवाच्या आकांताने ओरडू लागली. तिचा आवाज ऐकताच तिथे तैनात असलेल्या सुरक्षारक्षकाने क्षणाचाही विलंब न लावता हातात काठी घेऊन कुत्र्यांच्या दिशेने धाव घेतली. त्याने कुत्र्यांना हुसकावून लावल्याने चिमुरडीची त्यांच्या तावडीतून सुटका झाली. मुलगी सुदैवाने शारीरिकदृष्ट्या सुरक्षित असली, तरी या घटनेमुळे ती प्रचंड मानसिक धक्क्याखाली आहे.
रहिवाशांचा संताप आणि प्रशासनाकडे मागणी
पलावा सारख्या सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या वस्तीत भटक्या कुत्र्यांचा असा वावर असणे, यावर रहिवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ‘कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने’ या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.











