पुणे | बालेवाडी | दि. ३१ जुलै
पुण्यातील बाणेर-बालेवाडी परिसरात अमली पदार्थांच्या वाढत्या हालचालींबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बाणेर येथील सेवा रस्त्यालगत मोठ्या प्रमाणात वापरलेल्या इंजेक्शनच्या सिरिंज आणि सुया उघड्यावर पडलेल्या आढळून आल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीती, संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. या सिरिंजचा वापर अमली पदार्थांच्या सेवनासाठी झाला असावा, असा संशय नागरिकांनी व्यक्त केला असून, या प्रकारामुळे परिसरात ड्रग्ज रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, सेवा रस्त्याच्या कडेला अनेक वापरलेल्या सिरिंज आणि सुया विखुरलेल्या अवस्थेत दिसून आल्या. हा परिसर रहदारीचा असून नागरिक, विद्यार्थी, जॉगर्स आणि लहान मुले नियमितपणे ये-जा करतात. अशा ठिकाणी जैववैद्यकीय कचरा उघड्यावर पडलेला आढळल्याने केवळ अस्वच्छतेचाच नव्हे, तर संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
बाणेर-बालेवाडी परिसरात यापूर्वीही अमली पदार्थांशी संबंधित अनेक कारवाया समोर आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी बालेवाडी परिसरात मुंबईहून आलेल्या कारवर कारवाई करत सुमारे ९८ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) आणि अंदाजे ३६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. त्याचप्रमाणे बाणेरमधील एका पानटपरीवरून अमली पदार्थांची विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर संबंधित दुकानचालकालाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या सलग घटनांमुळे परिसरात अमली पदार्थांचे जाळे अधिक सक्रिय होत असल्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत.
बाणेर-बालेवाडी हा परिसर शाळा, महाविद्यालये, विद्यार्थ्यांची वसतिगृहे, आयटी कंपन्या, क्रीडा संकुले आणि उच्चभ्रू निवासी सोसायट्यांसाठी ओळखला जातो. अशा संवेदनशील भागात उघड्यावर वापरलेल्या सिरिंज आढळणे ही अत्यंत चिंताजनक बाब मानली जात आहे. या सिरिंजचा वापर नेमका कशासाठी करण्यात आला, त्यामध्ये कोणते पदार्थ होते आणि त्या येथे कोणी टाकल्या, याबाबत अद्याप अधिकृत माहिती उपलब्ध झालेली नाही. मात्र वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अशा सिरिंजचा वापर इंजेक्शनद्वारे अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही नागरिकांनी खेळाडूंकडून डोपिंगसाठीही अशा प्रकारच्या इंजेक्शनचा वापर होत असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही.
या प्रकारानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिस आणि महापालिका प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे. संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोषी व्यक्तींचा शोध घ्यावा, रात्री आणि पहाटेच्या वेळेत पोलिस गस्त वाढवावी, तसेच उघड्यावर पडलेल्या जैववैद्यकीय कचऱ्याची सुरक्षित विल्हेवाट लावावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
बाणेर-बालेवाडी नागरिक मंचाचे अमित कुदळे यांनी सांगितले की, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने या घटनेकडे अत्यंत गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे. रस्त्यावर पडलेल्या वापरलेल्या सुया केवळ स्वच्छतेचा प्रश्न नसून त्या एचआयव्ही, हिपॅटायटीससारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
दरम्यान, बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी सांगितले की, संबंधित ठिकाणाहून सर्व सिरिंज आणि सुया ताब्यात घेतल्या जातील. त्यामधील पदार्थांचे स्वरूप तपासण्यासाठी नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून या प्रकरणाचा तपास करण्यात येईल. याशिवाय बाणेर-बालेवाडी परिसरात पोलिसांची गस्त वाढवून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही वर्षांपासून पुण्यात अमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शिक्षण, आयटी आणि उद्योग क्षेत्रासाठी देशभरात ओळख असलेल्या पुण्यात अशा प्रकारच्या घटना वाढणे ही चिंतेची बाब असल्याचे सामाजिक संघटना आणि नागरिकांचे मत आहे. विशेषतः तरुण पिढी व्यसनाच्या विळख्यात अडकू नये, यासाठी पोलिस, प्रशासन, पालक, शैक्षणिक संस्था आणि समाज यांनी एकत्रितपणे प्रभावी जनजागृती आणि कठोर अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.
नागरिकांनीही परिसरात संशयास्पद हालचाली, अमली पदार्थांचा वापर किंवा विक्री होत असल्याची माहिती तातडीने पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. वेळेत कठोर आणि प्रभावी कारवाई न झाल्यास शहरातील अमली पदार्थांच्या समस्येला आणखी खतपाणी मिळू शकते, अशी भीती स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.











