मंचर, प्रतिनिधी : आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी व डोंगरी भागातील पाटण परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे महावितरणच्या उच्चदाब वीजवाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीत तब्बल १० वीजखांब कोसळल्याने परिसरातील अनेक गावांचा वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना अंधारासह विविध अडचणींचा सामना करावा लागत असला, तरी महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटी कामगार प्रतिकूल परिस्थितीतही वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी दिवस-रात्र अथक परिश्रम घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच महावितरणच्या घोडेगाव विभागाने तातडीने दुरुस्तीची मोहीम हाती घेतली. महावितरणच्या मार्गदर्शनाखाली अधिकृत कंत्राटदार शरयू इलेक्ट्रिकल आणि इंद्रजीत इलेक्ट्रिकल यांच्या पथकांनी दुर्गम डोंगराळ भागात पोहोचून कामाला सुरुवात केली. मात्र, मुसळधार पाऊस, चिखलाने भरलेले रस्ते आणि अवघड डोंगराळ भूभागामुळे यंत्रसामग्री घटनास्थळी नेणे अशक्य ठरत आहे.
अशा परिस्थितीत कर्मचाऱ्यांनी अवजड लोखंडी वीजखांब, वीजतारा, इन्सुलेटर आणि इतर आवश्यक साहित्य स्वतःच्या खांद्यावर वाहून अनेक किलोमीटरची पायपीट केली. सतत कोसळणारा पाऊस आणि कठीण भौगोलिक परिस्थिती यांची पर्वा न करता त्यांनी दुरुस्तीचे काम अखंड सुरू ठेवले आहे. वीजपुरवठा शक्य तितक्या लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व पथके युद्धपातळीवर कार्यरत आहेत.
याबाबत माहिती देताना घोडेगाव महावितरणचे अधिकारी आर. पी. भोपळे म्हणाले, “वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी सर्व कर्मचारी आणि कंत्राटी कामगार अहोरात्र प्रयत्न करत आहेत. प्रतिकूल हवामानामुळे अनेक अडचणी निर्माण होत असल्या तरी शक्य तितक्या लवकर दुरुस्ती पूर्ण करून नागरिकांना नियमित वीजपुरवठा सुरू करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.”
दरम्यान, संकटाच्या काळात स्वतःच्या सुरक्षिततेची पर्वा न करता दुर्गम डोंगररांगांत पोहोचून सेवा बजावणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या जिद्दीचे, कर्तव्यनिष्ठेचे आणि सेवाभावाचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक होत आहे. त्यांच्या अथक परिश्रमामुळे बाधित गावांतील जनजीवन पुन्हा सुरळीत होण्यास मदत होत असून, लवकरच संपूर्ण परिसरातील वीजपुरवठा पूर्ववत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.











