पुणे : केंद्रातील भाजप सरकारने गेल्या १२ वर्षात महागाईचा कळस गाठला, यामुळे या सरकारचे नेतृत्व करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘महागाई रत्न’ पुरस्कार देण्याची घोषणा पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा स्वाती शिंदे यांनी केली आहे.
पंतप्रधान मोदी यांनी पुरस्कार स्वीकारण्यासाठी पुण्यात यावे, अशी विनंती करणारे पत्र महिला काँग्रेसच्यावतीने पाठविण्यात आले असून पंतप्रधान मोदी हा पुरस्कार स्वीकारतील, अशी खात्री या पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. पंतप्रधान पुरस्कार स्वीकारण्यासाठी येतील तेव्हा हजारो लाडक्या बहिणी ‘अस्से कमळ नको ग बाई’ हे समूहगीत सादर करतील, असेही पत्रात म्हटले आहे.
आपल्या देशात घरगुती व व्यापारी गॅस, पेट्रोल, डिझेल, सी.एन.जी, धान्य, खते, दूध, अंडी, भाजीपाला, प्रवास अशा साऱ्याच स्तरांवरील महागाईमुळे जनता होरपळून निघत आहे. आपल्या १२ वर्षांच्या दिशाहीन कारभाराची ही फळं आहेत. असे पंतप्रधानांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.
मोदी सरकारची आर्थिक धोरणं चुकीची ठरलेली आहेत. त्याचे दुष्परिणाम सामान्य भारतीयांना भोगावे लागत आहेत. लोकांच्या भावना आणि संताप व्यक्त करण्यासाठी आम्ही ‘महागाई रत्न’ पुरस्काराची घोषणा केली आहे, असे स्वाती शिंदे यांनी स्पष्ट केले.











