पुन्हा येरवडा खुल्या कारागृहातून कैद्याने पलायन केल्याचा प्रकार समोर आहे. पुण्यातील एका खुनाच्यागुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा कैदी पळून गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
दोन दिवसांपूर्वीच सातारा जिल्ह्यातील एका शिक्षा भोगणाऱ्या कैद्याने पलायन केले होते. त्यानंतर आता ही दुसरी घटना समोर आली आहे.
याप्रकरणी जनार्दन शंकर अडसुळे (रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. याबाबत येरवडा पोलिस ठाण्यात सुभेदार चंद्रकांत सयाजी खांदवे (वय ५८) यांनी तक्रार दिली आहे. मंगळवारी दुपारी दोन ते चारच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, जर्नादन याच्याविरूद्ध खडक पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंद आहे. २०१७ मध्ये खुनाची घटना घडली होती. या गुन्ह्यात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. ती शिक्षा तो भोगत होता. त्याला येरवडा खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते.
दरम्यान, मंगळवारी दुपारी दोन ते चार यावेळेत त्याने सुरक्षा रक्षक तसेच तुरूंग कर्मचाऱ्यांची नजर चुकवून पळ काढला. काही वेळानंतर हा प्रकार समोर आल्यानंतर बुधवारी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास येरवडा पोलिस करत आहेत.
येरवडा कारागृहातील शेतीत सापडलेल्या मोबाईलच्या चौकशीच्या भीतीने जन्मठेपेची शिक्षा भोगणारा सातारा जिल्ह्यातील एक कैदी पळून गेल्याची घटना दोनच दिवसांपूर्वी समोर आली होती. संतोष लक्ष्मण भिंगारे (मूळ रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे या कैद्याचे नाव आहे. आता लागलीच दुसरा कैदी पळून गेल्याने येथील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
खूनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा भोगणारा आरोपी येरवडा खुल्या जिल्हा कारागृहातून पळून गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. येरवडा कारागृहातील शेतीत सापडलेल्या मोबाईलच्या चौकशीच्या भीतीने तो पळाल्याची प्राथमिक माहिती आहे. संतोष लक्ष्मण भिंगारे (मुळ रा. पाचवड, ता. वाई, जि. सातारा) असे कारागृहातून पळून गेलेल्या कैद्याचे नाव आहे. याप्रकरणी तुरुंगाधिकारी श्रेणी २ नागनाथ महादेव भानवसे (वय ५५, रा. मांजरी) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना 8 मे रोजी दुपारी दीड ते सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे.










