काळेवाडी परिसरात दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर पाणी साचणे, गटारे तुंबणे, खड्ड्यांमुळे अपघात होणे, झाडांच्या फांद्या कोसळणे इत्यादी समस्या निर्माण होत असतात.मात्र, यावर्षी महापालिका प्रशासनाकडून वेळेत कोणत्याही प्रकारच्या उपाययोजनेसंदर्भात जलदगतीने पावले उचलली जात नसल्याने नागरिकांत नाराजी आहे.
महापालिकेच्या ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत काळेवाडी, रहाटणी, थेरगाव, नखातेनगर आदी भागांमध्ये अनेक ठिकाणी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई अपूर्ण असल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला माती व बांधकामाचा राडारोडा पडून असल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्यास अडथळा निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी पथदिवे बंद असून झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणीही अद्याप झालेली नाही.
जनगणना, त्यासाठी प्रशिक्षण व इतर कामांमध्ये कर्मचारी- अधिकारी व्यस्त असल्याचे कारणे दिली जात असल्याचे सांगून मूळ कामे मार्गी लागत नसल्याचे दिसून येत आहे. काळेवाडी ते कस्पटे वस्ती, वाकडकडे जाणाऱ्या मुख्य बीआरटीएस मार्गावर एम. एम. शाळेसमोर दरवर्षी जवळपास दोन ते दीड फूट पाणी रस्त्याच्या बाजूला साचून वाहतूक कोंडी होत असते. पण, महापालिका ही समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तापकीर मळा, नखाते वस्ती आदी ठिकाणी रस्त्यावर साठणारे पाण्याची डबकी होऊ नये, यासाठी महापालिका विभागाने आताच पावसाळ्यापूर्वी कामे करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.











