April 27, 2026 5:24 pm

महाराष्ट्रातल्या ‘या’ गावात सफरचंदाची शेती, शेतकरी मालामाल

WhatsApp Join Button 👍 ग्रुप जॉइन करने के लिए यहाँ क्लिक करें

सफरचंद म्हटलं की डोळ्यांसमोर काश्मीर किंवा हिमाचल प्रदेशातील थंडी आणि बर्फाच्छादित डोंगर येतात. सफरचंदाचं पीक ही मोठ्या प्रमाणात याच भागात घेतलं जातं. सफरचंदाची शेती महाराष्ट्रात करावी असा विचार ही कोणी करणार नाही.

मात्र, महाराष्ट्राच्या मातीतही सफरचंद पिकू शकतात, हे वाई तालुक्यातील पसरणी घाटाच्या पायथ्याशी असलेल्या एका जिद्दी शेतकऱ्याने सिद्ध करून दाखवले आहे. बापू भिलारे असे या प्रयोगशील शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्या या सफरचंद बागेची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे. त्यांनी यशस्वीपणे इथं सफरचंदाची बाग फुलवली आहे.

भिलारे यांच्या या अजब प्रयोगाची दखल थेट प्रशासनाने घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्र महसूल आयुक्त, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच भिलारे यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आणि वेगळ्या हवामानात सफरचंदाचे पीक घेतल्याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी भिलारे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. प्रत्येक शेतकऱ्यांने असे काही तरी करण्याची गरज आहे असं ही त्यांनी या निमित्ताने सांगितले.

महाबळेश्वर आणि पाचगणीला जाणाऱ्या पर्यटकांच्या वाटेतच ही बाग असल्याने, आता पर्यटकांची पावले या बागेकडे वळू लागली आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकांना फाटा देऊन अशा नगदी पिकांकडे वळावे, जेणेकरून आर्थिक सुबत्ता येईल, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बापू भिलारे यांनी मोठ्या कष्टाने ही बाग उभारली आहे. त्यामुळे त्यांची भरभराट ही होणार आहे. त्यांच्या बागेतील सफरचंदाला आता पासूनच मोठी मागणी आहे. व्यापारी हे फळ खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. ही बाग लावताना त्यांनी कश्मीरमधील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेतले होते.

महाराष्ट्राचा ‘मिनी काश्मीर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरच्या पायथ्याशी वाईमध्ये आता प्रत्यक्ष सफरचंदाची लालचुटूक फळे लगडली आहेत. पसरणी घाट परिसरातील दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाईमध्ये बापू भिलारे या शेतकऱ्याने हा नवा इतिहास रचला आहे. भिलारे यांच्या कष्टाला फळ आले असून त्यांची बाग पाहण्यासाठी लोकांची झुंबड उडाली आहे. महसूल आयुक्त आणि जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन या फळांची चव चाखली आणि भिलारे यांचे अभिनंदन केले. “महाराष्ट्रात सफरचंद पिकवणे हे एक मोठे आव्हान होते, पण भिलारे यांनी ते लीलया पेलले आहे,” अशा शब्दांत अधिकाऱ्यांनी गौरवोद्गार काढले.

हा प्रयोग केवळ एका शेतकऱ्यापुरता मर्यादित न राहता, संपूर्ण सातारा जिल्ह्यासाठी एक दिशादर्शक ठरणार आहे. कमी जागेत आणि योग्य नियोजनाद्वारे सफरचंदाचे उत्पादन घेऊन लाखोंची कमाई करता येते, हे या प्रयोगातून समोर आले आहे. शेतीमध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील या शेतकऱ्याने अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली आहे. या बागेत आता फळे काढणीला आली असून पर्यटकांचा ओघ वाढला आहे.कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही या बागेची तांत्रिक पाहणी करून हा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी कसा फायदेशीर ठरेल, यावर चर्चा केली.

Leave a Comment

और पढ़ें

Cricket Live Score

Rashifal

और पढ़ें

error: Content is protected !!