निवडणूक आयोगाने मंगळवारी 5 वाजता प्रचार संपल्यानंतर उमेदवारांना घरोघरी जाऊन लोकांना भेटण्याची परवानगी दिल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे. हारलेली गोष्ट जिंकण्यासाठी निवडणूक आयोग मदत करत आहे असा थेट आरोप राज ठाकरेंनी केला आहे. हा जर जुना नियम असेल तर विधानसभा, लोकसभा किंवा त्याच्या आधीच्या निवडणुकांमध्ये का केलं नाही? अशी विचारणाही राज ठाकरेंनी केली आहे. राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरेही त्यांच्यासोबत होते.
काल 5 वाजता प्रचार थांबला आणि आपण ज्या काही निवडणुका इतकी वर्ष पाहत आहोत त्यात निवडणुकीचा प्रचार संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि नंतरच्या दिवशी मतदान ही आतापर्यंतची प्रथा आजपर्यंत होती. या सरकारला काय हवं आहे यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे,” असा आरोप राज ठाकरेंनी केला आहे.
तुम्ही 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटू शकता. ही नवी प्रथा, पद्घत कुठून आली याची कल्पना नाही. विधानसभा, लोकसभेला किंवा त्याआधी का नव्हती? ही आता कशासाठी आली? मतदारांना भेटू शकता, पण पत्रकं वाटू शकत नाही. पैसे वाटू शकता असं म्हणायचं असेल. ही मुभा का दिली? आता काय बदललं आहे? नव्याने या गोष्टी कशासाठी आणल्या जात आहेत?,” असे अनेक प्रश्न राज ठाकरेंनी विचारले आहेत.
पाडू नावाचं एक मशीन आणलं आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला नवं मशीन दाखवलेलं नाही. उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला पत्र दिलं असून, नवीन युनिट दाखवण्यास सांगितल आहे. हे काय मशीन आहे हे दाखवावं, सांगावं इथपर्यंतही आयोग गेलेलं नाही. त्याव उत्तर देत नाहीत. त्यांच्याकडून आता आम्हाला अपेक्षाही नाही. रोज कायदे बदलत आहेत. जनतेने प्रश्न विचारायला हवेत. सरकारला जी गोष्ट हवी आहे ती करुन देण्यासाठी निवडणूक आयोग आहे का? त्यांना ज्या सुविधा हव्या आहेत त्या मिळवून देण्यासाठी निवडणूक आयोग काम करत आहे का?,” असंही राज ठाकरेंनी विचारलं आहे.
सर्वांना सांगायचं आहे की सतर्क राहा. बूथवर कोणतया गोष्टी सुरु आहेत यावर लक्ष ठेवा. सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांवर लक्ष ठेवा. कशाप्रकारे पैसे वाटले जात आहेत हे दिसत असून, अनेक रिल्स बाहेर येत आहेत. भाजपा, शिंदेंकडून पत्रकाच्या आत लपवून पैसे वाटले जात आहेत. लोक नाकारत आहे ही आनंदाची गोष्ट आहे. जनतेने, शिवसेनेने, मनसेने सतर्क राहावं,” असं आवाहन राज ठाकरेंनी केलं आहे. हारलेली गोष्ट जिंकण्यासाठी निवडणूक आयोग मदत करत आहे हा आमचा आरोप आहे असंही त्यांनी ठामपणे म्हटलं.
“विधानसभेला, लोकसभेला का झालं नाही. या निवडणुकीत जुना नियम बाहेर काढावा असं का वाटलं? ईव्हीएम पुण जुनी आहे. इमर्जन्सी म्हणून वापरत आहोत असं त्यांचं म्हणणं आहे. ही नवीन काय मशीन आहेत हे लोकांनाही माहिती नाही. म्हणजे महाराष्ट्रात काय प्रकारचं राजकारण सुरु, निवडणुका सुरु आहे हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे,” असंही आवाहन त्यांनी केलं.
नवीन मशीनमधून मतदानात गडबड होणार नाही याची गॅरंटी कोण घेणार? इतकी बेबंदशाही सुरु आहे. आम्हाला आज असं वाटलं म्हणून केलं ही कोणती लोकशाही आहे असाही संताप त्यांनी व्यक्त केला.











