खत वितरणात पारदर्शकता राखण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; शेतकऱ्यांना योग्य दरात खत उपलब्ध करून देण्यावर भर
नगर : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात खतांची मागणी वाढली आहे. शेतकऱ्यांना आवश्यकतेनुसार आणि योग्य दरात खते उपलब्ध व्हावीत, तसेच वितरण व्यवस्थेत पारदर्शकता राहावी, यासाठी प्रशासनाने उपाययोजना सुरू केल्या आहेत. गोदामातील प्रत्यक्ष खतसाठा आणि ई-पॉस प्रणालीवरील डिजिटल साठा यामध्ये कोणतीही तफावत राहू नये. दोन्ही साठे नियमित तपासून अद्ययावत ठेवावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
जिल्ह्यात सध्या ६५ हजार मेट्रिक टनांपेक्षा अधिक खतसाठा उपलब्ध असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नसून, मागणीनुसार खत उपलब्ध करून देण्यासाठी पुरवठा व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
खत विक्रेत्यांनी दुकान व गोदामातील उपलब्ध साठ्याची नोंद ई-पॉस प्रणालीमध्ये वेळोवेळी अद्ययावत करावी. प्रत्यक्ष साठा आणि डिजिटल नोंदीमध्ये तफावत आढळल्यास वितरण व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विक्रेत्यांनी साठ्याच्या नोंदी काटेकोरपणे ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसारच खते मिळावीत, कोणत्याही खताची किंवा कृषी निविष्ठांची सक्तीची विक्री होऊ नये, तसेच शासनाने निर्धारित केलेल्या दरानुसारच खतांची विक्री करावी, यावर प्रशासनाने भर दिला आहे. खत विक्रीनंतर शेतकऱ्यांना पक्की पावती देणे आणि विक्रीची नोंद ई-पॉसवर करणे आवश्यक आहे.
शेतकऱ्यांनी अधिकृत कृषी सेवा केंद्रातूनच खते खरेदी करून पावती घ्यावी, तसेच पावतीवरील खताचे नाव, प्रमाण आणि दर तपासावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. साठ्यातील तफावत, जादा दराने विक्री किंवा इतर अनियमितता आढळल्यास संबंधित विक्रेत्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील खत वितरण व्यवस्थेवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून, कृषी विभागाच्या पथकांकडून कृषी सेवा केंद्रांची तपासणी केली जात आहे. प्रत्यक्ष आणि डिजिटल साठ्याची अचूक नोंद ठेवल्यास खत वितरण अधिक पारदर्शक होऊन शेतकऱ्यांना वेळेत आणि योग्य दरात खते मिळण्यास मदत होईल.











